

कोल्हापूर : राज्यात लवकरच तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) पदासाठी मेगा भरती होणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडून प्रथमच या पदासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यात सुमारे १ हजार ५३९ जागा आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील २९ जागांचा समावेश आहे.
राज्य शासनाने यावर्षीपासून तलाठी भरती प्रक्रिया राज्य लोकसेवा आयोगाकडून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यांकडून बिंदू नामावली निश्चित करून, रिक्त पदांची माहिती मागवली होती. त्यानुसार राज्यात १ हजार ५३९ तलाठी पदांची आता भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
राज्य लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ची २५ जून २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात राज्याच्या विविध विभागांतील २ हजार ६१९ पदांचा समावेश होता. त्यात सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार आणखी काही पदांचा समावेश करण्यात आला. त्यात आता तलाठी पदांच्या १ हजार ५३९ जागांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून आता ५ हजार ७०७ इतकी झाली आहे.
राज्य लोकसेवा आयोगाने गुरुवार, दि. २२ रोजी याबाबतचे नवे शुद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले. त्यात महसूल विभागातील १ हजार ५३९ ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदांचा समावेश करण्यात आल्याने तलाठी पदासाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नव्या शुद्धीपत्रकानुसार उमेदवारांना ५ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. २५ आक्टोबर रोजी ही पूर्वपरीक्षा होणार आहे.