

शिरोळ : जांभळी (ता. शिरोळ) येथील संदीप भाऊसाहेब पाटील (वय 44, रा. माळभाग जांभळी) यांच्या खुनातील मुख्य संशयित विठ्ठल अण्णाप्पा शिंदे (रा. शहापूर, इचलकरंजी) याला शिरोळ पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात उभे केले असता 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शिंदे याने सुपारी देऊन संदीप पाटील यांचा खून करवून घेतला आहे. खुनाचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट आहे.
मुख्य संशयिताचे साथीदार मुकेश बाळू जावीर (32, रा. दत्तनगर शहापूर) रवींद्र रतन कांबळे (35, रा. आंबेडकरनगर, इचलकरंजी) रतन मोहन कांबळे (33, मूळ रा. रुकडी, सध्या रा. घोनीमळा, शास्त्री सोसायटी, इचलकरंजी), लक्ष्मण ऊर्फ छोट्या तानाजी शिंदे (रा. इचलकरंजी) व मनोज चंद्रकांत अंबोलकर (41, शहापूर, इचलकरंजी) यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती.
नांदणी येथील कुरडे मळ्याजवळ दि.28 जानेवारीला रात्री संदीप पाटील यांचा खून झाला. घटनेनंतर हल्लेखोरांनी येथून पळ काढला होता. याप्रकरणी संशयित मुकेश जावेर, रवींद्र कांबळे, रतन कांबळे, लक्ष्मण ऊर्फ छोट्या शिंदे व मनोज आंबोलकर यांना पोलिसांनी अटक केले होते. 16 फेब—ुवारी रोजी रात्री 10 च्या सुमारास शिंदे याच्या मुसक्या आवळल्या.
सर्व संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. याकामी पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे, पोलिस उपनिरीक्षक गिरीश शिंदे, राजेंद्र पुजारी, मनोहर मडिवाल, बाबाचाँद पटेल, सचिन मगदूम, मोसीन पठाण यांच्यासह पोलिस पथकाने आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणला.
खुनाचे गूढ कायम
जांभळी येथे 28 जानेवारीला संदीप पाटील याचा लोखंडी रॉडने डोक्यात वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी संशयित आरोपींना पकडण्यात पोलिसांना 24 तासांत यश आले होते. मात्र, मुख्य आरोपी गेल्या 18 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याला अटक करण्यात यश आले असले, तरी संदीप पाटील याचा खून कोणत्या कारणातून झाला, याचे गूढ अजूनही कायम आहे.