महायुतीकडे कोल्हापूरच्या 50 वर्षांच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पाच दशकांचे शहराचे भविष्य ठरवणारी निर्णायक निवडणूक
Prakash Abitkar
कोल्हापूर : प्रभाग क्रमांक 20 मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर. समोर उपस्थित नागरिक.Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या पुढील 50 वर्षांच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन समोर घेऊन महायुतीची नियोजनबद्ध वाटचाल सुरू आहे, त्याला साथ द्या. शहराला आधुनिक, सुसज्ज आणि नागरिककेंद्रित बनवण्यासाठी दीर्घकालीन द़ृष्टिकोन आवश्यक आहे, तो महायुतीकडेच आहे, असे सांगत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

प्रभाग क्रमांक 20 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ पुईखडी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. मंत्री आबिटकर म्हणाले, महापालिका निवडणूक ही केवळ नगरसेवक निवडण्यापुरती मर्यादित नाही. ती शहराच्या पुढील पाच दशकांच्या विकासाचा आराखडा ठरवणारी निर्णायक निवडणूक आहे. यामुळे प्रभाग क्रमांक 20 मधील उमेदवारांसह महायुतीच्या शहरातील सर्वच उमेदवारांच्या पाठीशी कोल्हापूरकरांनी ठामपणे उभे राहावे. कोल्हापूर शहर आज अनेक आव्हानांना सामोरे जात आहे, असे सांगत आबिटकर म्हणाले, वाढती लोकसंख्या, अपुरी पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठ्याच्या समस्या, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा प्रक्रिया, तसेच शिक्षण व आरोग्य सुविधांचा ताण या सर्व बाबींवर एकत्रित आणि नियोजनबद्ध उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यावर केवळ तात्पुरत्या उपाययोजना नको, म्हणूनच महायुतीचे धोरण हे 50 वर्षांचा विकास व्हिजन समोर ठेवून आखले आहे.

राधानगरी मतदारसंघातून आलेल्या नेतृत्वाबाबत बोलताना ते म्हणाले, प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि कामाची जाण ही आपली ओळख आहे. केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात काम करणार्‍या लोकप्रतिनिधींना महायुतीत प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेतही अशीच कामकाजाची संस्कृती रुजवण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. स्थानिक प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याची क्षमता असलेले प्रतिनिधी निवडून दिले तरच प्रभागाचा सर्वांगीण विकास शक्य होईल. शहराचे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, त्या आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून राज्य व केंद्र शासनाच्या विविध विकासयोजना थेट कोल्हापूर शहरात आणल्या जात असून, त्याचा लाभ प्रत्येक प्रभागापर्यंत पोहोचवण्याचा महायुतीचा संकल्प आहे. महायुती महापालिकेत सत्तेत आल्यास विकास, शिस्त आणि पारदर्शक प्रशासन हे त्रिसूत्री धोरण राबवले जाईल, असा विश्वास व्यक्त करत कोल्हापूरला राज्यातील अग्रगण्य शहरांच्या पंक्तीत नेण्यासाठी, भविष्यातील पिढ्यांसाठी सक्षम आणि समृद्ध शहर घडवण्यासाठी महायुतीला साथ देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, नंदकुमार ढेंगे, माजी नगरसेवक अभिजित चव्हाण, हर्षल सुर्वे, अभय तेंडुलकर, अमरजा पाटील, सतीश मुगडे, बाबा नांदेकर, सुनील रसाळ, सुनील वाडकर, सचिन परीट, विजय जाधव, सुनील महाडेश्वर यांच्यासह उमेदवार अभिजित खतकर, नेहा अभय तेंडुलकर, वैभव कुंभार, सुरेखा सुनील ओटवेकर, सुषमा संतोष जाधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news