

राजेंद्र दा. पाटील
कौलव( जि. कोल्हापूर) : देशातील साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून 367 कारखान्यांनी हंगाम आटोपला आहे. 173 कारखान्यांचा हंगाम अद्याप सुरू आहे. देशात 2744 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन 261 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन 24 लाख मॅट्रिक टनाने जास्त आहे. महाराष्ट्राने ऊस गाळप व साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा साखर उताऱ्यात 0.23 टक्के वाढ झाली आहे.
यावर्षीच्या हंगामात देशात 540 कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या 7 ने जास्त होती. मार्च पर्यंत देशातील 367 कारखान्यांनी हंगाम आटोपला असून173 कारखान्यांचा हंगाम अद्याप सुरू आहे. महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला बाजूला करत उत्पादनात अग्रस्थान कायम राखले आहे. राज्यात 1036 लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून 98.50 लाख मेट्रिक टन साखर उत्पादित झाली आहे. राज्याचा सरासरी उतारा 9.50 टक्के आहे.
ठळक वैशिष्ट्ये
तेलंगणाचा 10.75 टक्के उतारा देशात सर्वाधिक
गुजरात 10.50 टक्के उताऱ्यासह दुसऱ्या क्रमांकावर
गेल्या वर्षी याच तारखेला 2547.79 लाख टन उसाचे गाळप होऊन 237.15 लाख टन साखर उत्पादित झाली होती .
महाराष्ट्रात फेब्रुवारी पर्यंत 4898 कोटी रुपये ऊस बिले थकीत
महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश या तीन राज्यात देशाच्या एकूण उत्पादनापैकी 76.11 टक्के उत्पादन.
दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशातील 120 कारखान्यांनी 802 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करत 81.50 लाख मेट्रिक टन साखर उत्पादित केली आहे, सरासरी साखर उतारा 10.15 टक्के एवढा आहे. कर्नाटकमधील 81 कारखान्यांनी 529लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करत 45.80 लाख टन साखर उत्पादित केली आहे. कर्नाटकचा सरासरी साखर उतारा 8.65 टक्केएवढा आहे. देशाच्या साखर उत्पादनात पहिल्या तीन क्रमांकावर असणाऱ्या राज्यांपेक्षा तेलंगणाने 10.75 टक्के एवढा देशात सर्वाधिक उतारा मिळवला आहे. मात्र या राज्यात केवळ 18.60 लाख टन उसाचे गाळप झाले आहे.