

आशिष शिंदे
कोल्हापूर : पर्यटनाच्या नकाशावर महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपली मोहोर उमटवली आहे. समुद्रकिनारे, गड, किल्ले, धार्मिक स्थळे, निसर्गरम्य ठिकाणे आणि मुंबई, पुणे, कोल्हापूरसारखी शहरे यामुळे महाराष्ट्र पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. २०२५ मध्ये राज्यात तब्बल २७ कोटी ५६ लाख देशांतर्गत पर्यटक भेटी नोंदल्या गेल्या. विशेष बाब म्हणजे विदेशी पर्यटकांसाठीही महाराष्ट्र 'फेव्हरेट डेस्टिनेशन' ठरत आहे. ४४ लाख ९७ हजार विदेशी पर्यटक भेटी दिल्या असून, विदेशी पर्यटकांच्या भेटींच्या बाबतीत महाराष्ट्राने देशात दुसरे स्थान पटकावले आहे.
पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. देशांतर्गत पर्यटक भेटींमध्ये महाराष्ट्र सहाव्या स्थानी, तर विदेशी पर्यटक भेटींमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. मुंबईची महानगरीय ओळख, अजिंठा, वेरूळचा वारसा, सह्याद्रीतील गड-किल्ले, कोकणचे समुद्रकिनारे, धार्मिक पर्यटन आणि पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे यामुळे महाराष्ट्राची पर्यटनाची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे देशांतर्गतच नव्हे, तर विदेशी पर्यटकांमध्येही महाराष्ट्राची पसंती वाढत असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.
महाराष्ट्राच्या पर्यटनाला गेल्या चार वर्षांत मिळालेली झेपही लक्षवेधी आहे. २०२१ मध्ये राज्यात ४ कोटी ३६ लाख देशांतर्गत पर्यटक आले होते. २०२५ मध्ये हा आकडा २७ कोटी ५६ लाखांवर पोहोचला. विदेशी पर्यटकांच्या भेटीही २०२१ मधील अवघ्या १ कोटी ८६ लाखांवरून २०२५ मध्ये ४४.९७ लाखांवर गेल्या. म्हणजे चार वर्षांत विदेशी पर्यटक भेटींमध्ये तब्बल २ हजार ३२२ टक्के वाढ झाली आहे.