

खेड : संगम माहुली येथील महाराणी ताराराणी समाधिस्थळाचे संरक्षण, जीर्णोद्धार व नूतनीकरणाचे काम चांगल्या पद्धतीने व लवकर होण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही खा. शाहू महाराज यांनी दिली.
संगम माहुलीतील महाराणी ताराराणी यांच्या समाधीकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे इतिहासप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत होती. हा प्रश्न दै. ‘पुढारी’ने अजेंड्यावर घेत आवाज उठवला. ‘मुघलमर्दिनी महाराणी ताराराणींची समाधी उपेक्षितच’ असे वृत्त प्रसिद्ध करून शासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर या समाधिस्थळाच्या जीर्णोद्धार, संवर्धनाचा विषय शासनाच्या अजेंड्यावर आला.
मंत्री शिवेंद्रराजे भोसले व मंत्री हसन मुश्रीफ यांनीही बैठका घेऊन समाधिस्थळाच्या संवर्धनासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सातार्यातील संगम माहुली येथील महाराणी ताराराणी यांच्या समाधिस्थळाला कोल्हापूरचे खा. शाहू महाराज यांनी भेट देऊन दर्शन घेतले आणि समाधिस्थळाची पाहणी केली. यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, संजय कदम, संगम माहुलीचे सरपंच प्रवीण शिंदे, प्रकाश माने, राहुल शिवनामे, चंद्रकांत कुंभार, अविनाश कोळपे, पोलिसपाटील शशिकला धोत्रे, जयवंत सपकाळ, शशिकांत सपकाळ, राजेंद्र देसाई, तसेच कोल्हापूर येथील शासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी खा. शाहू महाराज यांनी संगम माहुली येथील काशी विश्वेश्वर मंदिराच्या घाटानजीक कृष्णा नदीच्या पात्रातील वाळूच्या ढिगार्याखाली गेलेल्या महाराणी ताराराणी यांच्या समाधिस्थळाची पहाणी केली. थोरले शाहू महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. आप्पासाहेब महाराज यांच्या मंदिरानजीक ठेवलेल्या महाराणी ताराराणी यांच्या वज्रलेप केलेल्या दगडी अवशेषांचे त्यांनी दर्शन घेतले. व ग्रामस्थांशी संवाद साधला.
बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी संगम माहुली येथील घाट व परिसरातील विकास आराखड्याबाबत तयार केलेल्या आराखड्याची माहिती दिली. त्यावेळी महाराणी ताराराणी यांच्या समाधी संवर्धनाचे काम लवकरच मार्गी लावणार असल्याचे खा. शाहू महाराज यांनी सांगितले.
खा. शाहू महाराज यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सातार्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी समाधिस्थळ जीर्णोद्धाराबाबत चर्चा केली. संतोष पाटील यांनी महाराणी ताराराणी समाधी जीर्णोद्धाराचा आराखडा सादर केला. खा. शाहू महाराज यांनी त्याची पाहणी करत काही बदल सुचवले. संतोष पाटील यांनी हे बदल करून प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल, असे सांगितले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शाहू महाराज म्हणाले, शासनाने महाराणी ताराराणी यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम मनावर घेतले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे. एक नवे श्रद्धास्थान निर्माण होत असल्याने या ठिकाणी इतिहासप्रेमींसह पर्यटक वाढणार आहेत. दोन्ही जिल्हाधिकार्यांमध्ये समन्वय असल्याने लवकर काम पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.