Madhuri Elephant | हजारोंच्‍या साक्षीने ‘माधुरी’चे स्‍वागत

१,१६० कि.मी.चा प्रवास करत ३२ तासांनी नांदणीत : अनेकांना आनंदाश्रू
Madhuri Elephant |
नांदणी : ‘माधुरी’च्या स्वागतासाठी नांदणीच्या गांधी चौकात उसळलेल्या गर्दीचे ड्रोनच्या साहाय्याने घेतलेले हे छायाचित्र.
Published on
Updated on

जयसिंगपूर : महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकचे लक्ष लागून राहिलेल्या नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाच्या ‘महादेवी’ ऊर्फ ‘माधुरी’ हत्तिणीचा परतीचा प्रवास अखेर सुखकर पूर्ण झाला आहे. तब्बल ४०९ दिवसांनंतर ‘माधुरी’चे हक्काच्या घरात पुनरागमन झाल्याने नांदणीसह परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून उपस्थित हजारो सर्वधर्मीय नागरिकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले होते.

गुजरात राज्यातील जामनगर येथील ‘वनतारा’ हत्ती पुनर्वसन केंद्रातून गुरुवारी सायंकाळी ५.१५ वाजता विशेष ॲनिमल ॲम्बुलन्समधून ‘माधुरी’ची रवानगी केली. ‘वनतारा’ची टीम आणि वैद्यकीय ताफ्यासह बडोदा, सुरत, वापी, नवसारी, वसई, विरार, ठाणे, पुणे, सातारा व कराड असा तब्बल १,१६० किलोमीटरचा ३२ तासांचा प्रवास पूर्ण करत ‘माधुरी’ शुक्रवारी रात्री नांदणी मठात सुरक्षितरीत्या दाखल झाली.

स्वागतासाठी नांदणी येथील गांधी चौकात हजारो नागरिक एकत्र आले होते. माजी खासदार राजू शेट्टी यांचे आगमन होताच त्यांच्यावर गुलाबांची उधळण केली. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, दत्त समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी ‘माधुरी’च्या वाहनाचे स्वागत केले. जेसीबीच्या साहाय्याने फुलांचा भव्य वर्षाव केला. नागरिकांनी साखर-पेढ्यांचे वाटप केले. प्रमुख मार्गांवर स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. केवळ नांदणीच नव्हे, तर कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव जिल्ह्यांतील सर्वधर्मीय नागरिक, महिला, वृद्ध व लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निशिधिका परिसरात वाहन पोहोचल्यानंतर ‘वनतारा’ टीम, वन विभाग आणि आरोग्य पथकाच्या मदतीने ‘माधुरी’ला सुरक्षितरीत्या खाली उतरले. अत्यंत मंगलमय व भावुक वातावरणात तिने नवनिर्मित निवासस्थानात प्रवेश केला. याप्रसंगी नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, वरूर मठाचे स्वस्तिश्री धर्मसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी आणि कोल्हापूर मठाचे स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी ‘माधुरी’चे धार्मिक विधीनुसार स्वागत केले.

तब्बल ४०९ दिवसांनंतर आपल्या लाडक्या हत्तिणीला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. हा ऐतिहासिक क्षण मोबाईलमध्ये टिपण्यासाठी उपस्थितांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २५ हून अधिक पोलिस अधिकारी, १०० हून अधिक पोलिस कर्मचारी आणि ५० पेक्षा जास्त होमगार्डचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कोल्हापूरकरांनी करून दाखवले

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ‘माधुरी’ला ‘वनतारा’ येथे पाठवलेेे. त्यानंतर नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर नांदणी मठ, सर्वधर्मीयांचे पाठबळ, राजू शेट्टी यांचे मोठे आंदोलन आणि राज्यासह देशभरातून झालेला उद्रेक आणि ‘माधुरी’ हत्तिणीची घरवापसी हे कोल्हापूरकरांनी करून दाखवले आहे.

असा होता ‘वनतारा’तील दिनक्रम

गुजरात येथील ‘वनतारा’च्या पुनर्वसन केंद्रात ३७६ हत्ती आहेत. ‘माधुरी’ची दोन माहूत देखभाल करत होते. सकाळी उठल्यानंतर चारा देणे, फेरफटका मारणे, त्यानंतर सकाळच्या सत्रातील खाद्य व फळे देत दुपारी स्वच्छता करून स्विमिंग टॅंकमध्ये सोडणे, दुपारी ओला व सुका चारा, पिण्यासाठी पाणी अशी व्यवस्था करण्यात येत होती. सायंकाळी खाद्य झाल्यानंतर फेरफटका मारणे आणि रात्री फळे व चारा असे. सकाळच्या सत्रात वैद्यकीय पथकाकडून पाहणी केली जात असे.

‘वनतारा’चे देखभालीसाठी सहकार्य

हाय-पॉवर्ड कमिटीच्या मंजुरीनंतर ‘माधुरी’ला कोल्हापूरच्या नांदणी मठात परतण्यास परवानगी मिळाली. त्यानुसार तिला आणले. ‘माधुरी’कडून कोणतेही काम करून घेतले जाणार नाही. २४ तास देखभाल आणि दर १५ दिवसांनी आरोग्य तपासणीची अट आहे. आरोग्य तपासणी व उपचारांसाठी ‘वनतारा’चे पशुवैद्यक विभाग सहकार्य करणार आहे. शुक्रवारी ‘वनतारा’च्या ४० कर्मचाऱ्यांचे पथक नांदणीत दाखल झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news