

दिलीप भिसे
कोल्हापूर : विदेशी दारूच्या किमतीत दरवाढ झाल्याने राजस्थान, हिमाचलसह मध्य प्रदेशातील कुख्यात संघटित तस्करी टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. पुणे- बंगळूर, रत्नागिरी-नागपूर महामार्गासह सीमावर्ती भागात तस्करी लॉबीने दहशत निर्माण केली आहे. एव्हाना ‘चिरीमिरी’ला सोकावलेल्या छुप्या रुस्तुमांना हाताशी धरून महामार्गावर कब्जाच केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने पंधरवड्यापूर्वी कोल्हापूर-गारगोटी मार्गावर हणबरवाडीजवळ मध्य प्रदेशातील ठाकूरसिंह टोळीतील दोघांना जेरबंद करून एक कोटी 20 लाखांचा दारूसाठा जप्त केला. पाठोपाठ राजस्थानात जालोर जिल्ह्यात बिष्णोई टोळीशी लागेबांधे असलेल्या भलाराम बिष्णोई याला जयसिंगपूरजवळील मजले खिंडीत बेड्या ठोकून 40 लाखांचा बनावट दारूसाठा हस्तगत करण्यात आला.
कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील सराईत टोळ्यांना हाताशी धरून तस्करी टोळ्यांनी पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातही भेसळ दारू तस्करीचा फंडा चालविला आहे. विशेष म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेशसह बिहार व हिमाचलमध्ये प्रचंड दहशत निर्माण केलेल्या टोळ्यांनी दारू तस्करीवर नियंत्रण ठेवल्याने दररोज तस्करीतून कोट्यवधीच्या उलाढाली होत असतानाही स्थानिक यंत्रणा ढिम्म आहेत.
पुणे-बंगळूर आणि रत्नागिरी-नागपूर महामार्ग म्हणजे तस्करी टोळ्यांना मोकळीक असल्याचेच चित्र आहे. विदेशी दारू महागल्याने स्वस्तात मस्त, पण झिंग देणार्या भेसळ दारूला प्रचंड मागणी होऊ लागली आहे. कदाचित व्होल्टमसारख्या जीवघेण्या घटनेची पुनरावृत्ती तर होणार नाही ना, यासाठी वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे.