

कोल्हापूर : सोमवार पेठ, गंजी गल्ली येथील सागर पाटोळे व प्रसाद बुलबुले यांच्यात पूर्ववैमनस्यातून धुमसणारा संघर्ष गुरुवारी उफाळून आला. दोन्हीही गटांकडून धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात सागर बाळकृष्ण पाटोळे (वय ३६, रा.गंजी गल्ली, सोमवार पेठ) व प्रसाद नारायण बुलबुले (५२, रा. गंजी गल्ली) जखमी झाले. सागर पाटोळे यांच्या गळ्यावर धारदार चाकूने हल्ला झाल्याने त्याची प्रकृती गंभीर बनली आहे. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे गंजी गल्लीसह परिसरात दिवसभर तणावाची स्थिती होती. पोलिसांनी बुलबुले गटातील तिघांना ताब्यात घेतले आहे.
दोन्हीही गटामार्फत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. सागर पाटोळे यांच्या फिर्यादीनुसार प्रसाद बुलबुले (वय ५२),राजू बुलबुले (२३), प्रमोद बुलबुले (५०,रा. गंजी गल्ली) याच्यासह एका अल्पवयीन संशयिताचा समावेश आहे. तर, प्रसाद बुलबुले यांच्या फिर्यादीनुसार सागर बाळकृष्ण पाटोळे (रा. गंजी गल्ली, कोल्हापूर) याच्याविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे.
दोन गटांत परस्परविरोधी झालेल्या हल्ल्यानंतर सोमवार पेठ, गंजी गल्ली परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. गळ्यावर चाकूहल्ला झाल्याने सागर पाटोळे जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. अतिरक्तस्राव होऊन प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.पाटोळे व बुलबुले कुटुंबीय समोरासमोर राहतात. नातेवाईकाच्या श्राद्धविधीसाठी दारात उभारण्यात आलेल्या मंडपाच्या कारणातून दोन गटांत वारंवार वादावादी होत असत. शुक्रवारी दोन्हीही कुटुंबीय समोरासमोर आले. शिवीगाळीसह एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. वादावादी सुरू असतानाच सागर पाटोळे यांच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आला. यावेळी झालेल्या झटापटीत प्रसाद बुलबुलेही जखमी झाले.