

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा होणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. प्रत्येक तालुक्यात नेत्यांच्या व पक्षाच्या भूमिका वेगवेगळ्या असल्याने जिल्हा पातळीवर राहू दे, तालुका पातळीवरही युती- आघाडी अस्तित्वात आणताना नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. आता आहे तसे लढायचे व निवडणुकीनंतर युती-आघाडीचे काय ते बघायचे, असाच नेत्यांचा सूर आहे.
करवीर तालुक्यावर काँग््रेासचे वर्चस्व राहिले आहे. सतेज पाटील, पी. एन. पाटील यांनी हे वर्चस्व राखले; मात्र नव्या जुळणीत पी. एन. पाटील यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी अजित पवार राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेथे चंद्रदीप नरके हे शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे करवीरला महायुतीतच सामना स्पष्ट दिसत आहे. तेथे काँग््रेासची बाजूही सतेज पाटील यांनाच लढवावी लागणार आहे. मंगळवारी पाटील गटाचे उमेदवारी अर्ज भरताना ए. वाय. पाटील यांची असलेली उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
कागलचा पॅटर्नच वेगळा
कागलला शिवसेना नेते संजय मंडलिक यांना वगळून हसन मुश्रीफ, समरजित घाटगे व संजय घाटगे एकत्र आले आहेत. त्यामुळे तेथे महायुती बिघडली आहे. मंडलिक व संजय घाटगे एकत्र येणार असे वाटत असतानाच अचानकपणे समरजित घाटगे भाजपच्या व्यासपीठावर आल्यामुळे कागलच्या राजकारणाचे संदर्भच बदलून गेले आहेत.
राधानगरीत तिरंगी लढती?
राधानगरीच्या मेहुण्या-पाहुण्यांच्या राजकारणात ए. वाय. पाटील यांनी काँग््रेासबरोबर हातमिळवणी करण्याचे ठरविले आहे. ए. वाय. पाटील, काँग््रेास व राष्ट्रवादीतील राहुल पाटील गट एकत्र येऊन स्थानिक पातळीवर एकत्र येण्याचे ठरविले आहे. ए. वाय पाटील यांनी स्वतंत्र आघाडी करण्याचे ठरविल्यानंतर के. पी. पाटील, अरुण डोंगळे एकत्र येतील तर शिवसेना भाजप युती एकत्रित लढेल. त्यामुळे राधानगरीत तिरंगी लढती पाहायला मिळतील, असे चित्र आहे. मात्र, माघारीपर्यंत कोणत्या तडजोडी होतात, ते पाहावे लागेल.
भुदरगडला मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
भुदरगडकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आहे. त्यामुळे प्रकाश आबिटकर व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भेटीत काय ठरेल, त्यावर तालुक्याचे राजकारण अवलंबून असेल. मात्र, या तालुक्यात दोन्ही मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तेथे आबिटकर व पाटील यांच्याविरोधात के. पी. पाटील व राष्ट्रवादी एकत्र येतील, अशी चिन्हे आहेत.
गडहिंग्लजला तिरंगी लढत
गडहिंग्लजला काँग््रेास स्वबळावर लढत आहे, तर माजी आमदार राजेश पाटील व नंदाताई बाभूळकर एकत्र आले आहेत. हसन मुश्रीफ हे कागलच्या राजकारणाचा पॅटर्न येथेही राबवतील. भाजप व जनता दल एकत्र असून, ठाकरे शिवसेना एक जागा लढणार आहे. तर शिंदे शिवसेनेची भूमिका उद्या ठरेल, असे सांगण्यात आले.
हातकणंगलेत पक्षीय लढती
हातकणंगले तालुक्यात महायुतीच्या नेत्यांची भूमिका एकत्र लढण्याची आहे. तेथे वारणेच्या बाजूला असलेले पाच मतदारसंघ विनय कोरे यांच्याकडे असून, तीन मतदारसंघ महादेवराव महाडिक यांच्या गटाकडे तर उर्वरित मतदारसंघात धैर्यशील माने व राहुल आवाडे समर्थक लढणार आहेत; तर काँग््रेासचे राजूबाबा आवळे यांनी पक्षाकडून सर्व जागा लढण्याचे ठरविले आहे.
आजऱ्यात मंत्रीच ठरविणार
आजरा तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन मतदार संघ आहेत. प्रत्येकी एक मतदारसंघ हा हसन मुश्रीफ व प्रकाश आबिटकर यांच्या विधानसभामतदारसंघाला जोडलेला असून, तेथे तेच काय ते ठरविणार आहेत.
शिरोळला स्थानिक आघाड्या
शिरोळ तालुक्यात स्थानिक आघाड्यांमध्ये लढत होत आहे. तेथे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, भाजप व शिंदे शिवसेना एकत्र आहे. त्यांच्याविरोधात काँग््रेास, स्वाभिमानी शेतकरी संघटना व ठाकरे शिवसेना लढत देत आहेत. स्वाभिमानीतील फूट मतदार मान्य करणार का ? तेही निकालातून स्पष्ट होईल. शिरोळला नेत्यांच्या भूमिका ठाम आहेत. महायुतीच्या जागावाटपात शिंदे शिवसेनेचा वरचष्मा राहील, असे दिसते.
पन्हाळ्यात प्रत्येकाची स्वतंत्र भूमिका
पन्हाळ्यात जनसुराज्य शक्तीला महायुतीतील घटक पक्षांशीच सामना करावा लागेल, असे चित्र आहे. तेथे जनसुराज्य शक्तीच्या विरोधात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांनीही अर्ज दाखल केले असून माघारीपर्यंत तेथील चित्र स्पष्ट होणे कठीण आहे.
शाहूवाडीत गटांत लढती
शाहूवाडी तालुक्यात विनय कोरे व कर्णसिंह गायकवाड विरुद्ध सत्यजित सरूडकर व मानसिंगराव गायकवाड गटात लढत होत आहे. तेथे राजकीय जुळणीत नव्याने राजकारण आकाराला येत आहे. गायकवाड घराण्यातच येथे राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे.
चंदगडला नव्या जोडण्या
चंदगडला नव्या फेरजुळणीत काँग््रेास नेते गोपाळराव पाटील यांनी भाजप आमदार शिवाजीराव पाटील यांच्याशी जुळवून घेण्याचे ठरविलेले दिसते. तेथे भाजपचे वर्चस्व असून नव्याने राजकीय मांडणी होत आहे. तेथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत.
गगनबावड्यात आघाडी विरुद्ध युती
गगनबावडा तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन मतदारसंघ आहेत. तेथे काँग््रेासने जि. प. व पं स. साठी सहा उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यांच्याविरोधात महायुतीतील भाजप, शिवसेनेचे उमेदवार रिंगणात असतील.