दिलीप भिसे
कोल्हापूर : वर्षाला शासन तिजोरीत 4 कोटी 54 लाखांचा महसूल देणार्या कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचा पसारा भाड्याच्या खोलीत थाटला आहे. व्हीआयपी बंदोबस्तासह वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी केवळ शंभर पोलिसांवर आहे. लोकप्रतिनिधींची उदासिनता आणि वरिष्ठांचा कानाडोळा याला कारणीभूत आहे.
करवीर निवासिनी अंबाबाई, दख्खनचा राजा जोतिबा यात्रा, धार्मिक स्थळांसह पर्यटनासाठी शहर, जिल्ह्यात मांदियाळी असते. विविध यात्रा, उत्सव काळात शहरासह महामार्ग वाहनांच्या गर्दीने फुलतात. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, मंत्री, अधिकारी दौरे, संप, आंदोलन, मोर्चे या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रण शाखेंतर्गत घटकांना तारेवरील कसरतच करावी लागते. भाविक, पर्यटकांची करवीरनगरीत अलोट गर्दी होत असल्याने त्याचा ताण वाहतूक व्यवस्थेवर पडतो.
किमान 180 पोलिस आवश्यक
पोलिस निरीक्षक, दोन सहायक, एक उपनिरीक्षक आणि शंभर पोलिसांवर यंत्रणेचा डोलारा आहे. जिल्ह्याची लोकसंख्या आणि 16 लाख 98 हजारांवर वाहनांची संख्या याचा ताळमेळ घातल्यास वाहतूक शाखेकडे मनुष्यबळ अत्यंत तोकडे आहे. किमान सहा अधिकारी आणि 180 कर्मचार्यांची गरज आहे.
मध्यवर्ती 67 पाईंट, नियोजनासाठी कसरत !
मध्यवर्ती चौकात 67 पाईंट आहेत. प्रत्येक ठिकाणी एक-दोन कर्मचार्यांची नियुक्ती, मध्यवर्ती ताराराणी चौक, सीबीएस चौक, तावडे हॉटेल, व्हिनस कॉर्नर, बिंदू चौक, सीपीआर चौक, सर्किट बेंच परिसर, भवानी मंडप, मिरजकर तिकटी, संभाजीनगर, कोंडा ओळ, रेल्वे स्थानक परिसर, रंकाळा टॉवर, क्रशर चौक, पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय चौक, न्यायसंकुल परिसरातील वाहतूक नियोजनासाठी तारेवरची कसरतच करावी लागते. जानेवारी ते डिसेंबर काळात जिल्ह्यात झेड प्लस 46 दौरे झाले. या काळात यंत्रणेची दमछाक होते.
66 हजार वाहनांवर कारवाई
वाहतूक नियमाचे उल्लंघन करणार्या 66 हजार 73 वाहनांवर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई करून 4 कोटी 54 लाख 54 हजार 100 रुपयांचा महसूल गोळा केला. मात्र पार्किंग कर्यालयासोमर व्यवस्था नाही, पोलिसांना बसायला जागाही नाही.