

उजळाईवाडी : कोल्हापूर-नवी मुंबई-कोल्हापूर या हवाई मार्गावर दिवसातून दोन वेळा इंडिगो एअरलाईन्सची विमान सेवा रविवारपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी नव्या सेवेच्या विमानातून 67 प्रवासी कोेल्हापुरात आले, तर मुंबईला 65 प्रवासी रवाना झाले.
सकाळी कोल्हापुरात दाखल झालेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या पहिल्या विमानातून महिला बालविकासमंत्री आदिती तटकरे यांच्यासह अन्य प्रवाशांचे आगमन झाले. खा. धनंजय महाडिक यांनी या सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. याच विमानातून मुंबईला जाणार्या लोकमत माध्यम समूहाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा यांच्यासह अन्य प्रवाशांना बोर्डिंग पास देऊन महाडिकांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी कोल्हापूर विमानतळ संचालक अनिल शिंदे, विमानतळ अधिकारी अनिल श्रीवास्तव, राजेश अहिरवार, बेनू नायक, अंकित व्यास, रविराज लामकाने, राजेश पेडणेकर आदी उपस्थित होते.
दिवसातून दोनवेळा उपलब्ध झालेल्या या हवाई सेवेमुळे उद्योजकांसह बाहेरील उद्योग, व्यवसाय कोल्हापुरात येण्यासाठी कनेक्टिव्हीटी वाढणार असून पर्यटन वाढीला चालना मिळेल, असे खा. महाडिक यांनी सांगितले. येथील विमानतळावर रात्री येणारे ही पहिलीच कमर्शियल फ्लाईट आहे.
इंडिगो एअरलाईन्सचे विमान रोज सकाळी 8 वाजता नवी मुंबई विमानतळावरून टेकऑफ घेऊन 9 वाजून 15 मिनिटांनी कोल्हापुरात येईल. 20 मिनिटाच्या विश्रांतीनंतर 9 वाजून 35 मिनिटांनी कोल्हापुरातून टेकऑफ घेऊन 10 वाजून 25 मिनिटांनी नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे. सायंकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी नवी मुंबई विमानतळावरून टेकऑफ घेऊन रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर लँडिंग होईल. 20 मिनिटाच्या विश्रांतीनंतर 8 वाजून 50 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून टेकऑफ घेऊन रात्री 10 वाजून 35 मिनिटांनी नवी मुंबईत पोहोचणार आहे.