

चंदगड : सोनारवाडी ( ता. चंदगड ) येथील गौराबाई रामू गावडे ( वय ६० ) या महिलेचा जीबीएस सिंड्रोम आजाराने मृत्यू झाल्याने चंदगड तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील आणि जिल्ह्यातील हा अलीकडच्या दशकातील सिंड्रोमचा पहिलाच बळी ठरला. दहा वर्षांपूर्वी नांदवडे येथे दोघांचा मृत्यू झाला होता.
गावडे या आठ दिवसांपासून आजारी होत्या. प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना सीपीआर रुग्णालय दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर इलाज झाला नाही, अखेर गुरुवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या मृत्यूने सरकार अलर्ट मोडवर आले असून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गंभीर दखल घेत आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
गावडे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर जीबीएस सिंड्रोम झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले. प्लास्मापेरिसिसचे उपचार सुरु होते. उपचारास जराही प्रतिसाद मिळत नव्हता. आणखीन ७ रुग्ण उपचार घेत असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे समजते. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.