कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने ‘महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ (एमआरडीपी) अंतर्गत नव्या साठवण तलाव आणि सध्याच्या तलावांची दुरुस्ती याकरीता डीपीआर तयार केला जाणार आहे. हा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) करण्यासाठी ७ कोटी ३९ लाख रुपयांच्या निधीला शुक्रवारी राज्य शासनाने मान्यता दिली.
कृष्णा आणि भीमा खोऱ्यात उद्भवणाऱ्या पूर आपत्तीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या प्रकल्पाअंतर्गत पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी नवे पाणी साठवण तलाव उभारले जाणार आहेत. यासह सध्या अस्तित्वात असलेल्या तलावांची दुरुस्ती केली जाणार असून यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याकरीता सल्लागार संस्था नियुक्त होणार आहे. त्यासाठीच्या ७ कोटी ३९ लाख ४० हजार १०० रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.