

कोल्हापूर : राज्यातील जिल्ह्यांत विकासाला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या “संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्प (महास्ट्राईड)” अंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या जिल्हा विकास आराखडा अंमलबजावणीत जिल्ह्याने शंभर टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचा विशेष गौरव व अभिनंदन करण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्वतंत्र पडताळणी संस्थेमार्फत जिल्हा विकास आराखड्यातील विविध प्रकल्प, पायाभूत सुविधा, सामाजिक कल्याण योजना, आर्थिक तरतुदींचा विनियोग आणि ध्येयपूर्तीचे कडक निकषांवर मूल्यांकन करण्यात आले. त्यात जिल्ह्याने पारदर्शक अंमलबजावणी, वेळेत प्रकल्पपूर्ती, निधीचा प्रभावी वापर आणि खाजगी गुंतवणूक या सर्व क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करत शंभर टक्के गुण मिळवल्याची माहिती ‘डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक युनिट’चे जिल्हा प्रमुख डॉ. अरुण धोंगडे यांनी दिली.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, सर्व खासदार, आमदार, जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे व सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या उपायुक्त सीमा आर्दाळकर, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार, सागर पाटील, गोपाळ निगवेकर, संदीप फुलारी, किरण मोरे, पांडुरंग लाड आदी उपस्थित होते.
कोल्हापूरचे विकसित महाराष्ट्रासाठी पाऊल
महाराष्ट्र राज्याच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था आणि विकसित महाराष्ट्र २०४७ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला बळ देणारा तसेच कृषी, उद्योग, पायाभूत सुविधा, पर्यटन आणि ग्रामीण विकासाचा समतोल साधत कोल्हापूरने विकसित महाराष्ट्र ध्येय साध्य करण्याकरिता पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.