

निखिल रोकडे
नाशिक : देशातील शालेय शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता, उपलब्ध सुविधा आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती यांचे मूल्यमापन करणारा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा शैक्षणिक कामगिरी निर्देशांक (परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स पीजीआय २०२५) अहवाल जाहीर झाला असून त्यात महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याने देशभरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूरने प्रचेस्ता-१ श्रेणीत ६०० पैकी ४६३ गुण मिळवत देशातील ७८२ जिल्ह्यांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.
पंजाबमधील बर्नाला (४६१ गुण) आणि मुक्तसर (४५६ गुण) या जिल्ह्यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकविला आहे. राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेच्या स्पर्धेत कोल्हापूरने देशात अव्वल झेप घेतल्याने शिक्षण क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे.
असे होते मूल्यांकन
पीजीआय अहवालात राज्यांचे मूल्यांकन एकूण १००० गुणांच्या आधारे केले जाते. यामध्ये अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता, उपलब्धता, पायाभूत सुविधा, समानता, प्रशासकीय प्रक्रिया आणि शिक्षक शिक्षण व प्रशिक्षण या सहा प्रमुख घटकांचा समावेश असतो. विद्यार्थ्यांची प्रगती, पटसंख्या, शाळा गळती, वर्गखोल्या, वीज, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि शालेय व्यवस्थापन या बाबींची तपासणी केली जाते.