

विशाळगड : शाहूवाडी तालुक्यातील पालेश्वर ल.पा. तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, सुरक्षिततेचा उपाय म्हणून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी ७ वाजता हा तलाव ओसंडून वाहू लागला. तलावाची पाणी साठवण क्षमता ८.८७ दलघमी इतकी आहे.
येथील सांडव्यातून वाहणाऱ्या प्रवाहातून मोठा धबधबा निर्माण होतो. त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढते. सुरक्षिततेच्या दृष्टीने पालेश्वर धरण क्षेत्र हे सध्या 'निषिद्ध क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आले असून वाढत्या पाण्याचा धोका लक्षात घेता पर्यटकांना येथे येण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पर्यटक व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन कडवी शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी केले आहे.
कासारी खोऱ्यात पावसाची धुवांधार बॅटिंग सुरू आहे. परिणामी नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहे. पालेश्वर धरणाच्या सांडव्यातून पाणी प्रवाहित झाल्याने पालेश्वर धबधबा ओसंडून कोसळू लागला आहे. पर्यटकांनी सावधानता बाळगावी तसेच शाळी नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.