

कोल्हापूर : जिल्ह्यातील तब्बल ४५८ ग्रामपंचायतींची निवडणूक कोण लढवणार हे गुरुवारी (दि.११) आणि शुक्रवारी (दि.१२) स्पष्ट होणार आहे. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी या दोन दिवशी प्रभाग आरक्षण सोडत काढली जाणार आहे. सोयीचा प्रभाग आपल्यासाठीच राखीव राहू दे, असे साकडे अनेकांनी घातले आहे, त्यातून इच्छुकांत प्रचंड धाकधूक आहे.
जिल्ह्यात २०२५ मध्ये २५ ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. यावर्षी ४३३ ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. यामुळे या वर्षाअखेर मुदत संपणाऱ्या एकूण ४५८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू आहे. त्याच्या दुसऱ्या टप्प्यात अंतिम प्रभाग रचनेची आता आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
प्रभाग रचनेची सोडत काढण्यासाठी तहसीलदारांनी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार दि.८ रोजी आरक्षण सोडतीसाठी विशेष ग्रामसभा बोलवण्याची नोटीस काढण्यात आली. या नोटिसीनुसार किमान दोन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी गुरुवार, दि.११ रोजी तर काही ग्रामपंचायतींत शुक्रवार, दि.१२ रोजी आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावली आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुकांचा उडणार धुरळा
प्रभाग आरक्षण सोडतीवर हरकती, सूचना दाखल झाल्यास, त्यावरील सुनावणी घेऊन दि. ८ जुलै रोजी ते आरक्षण अंतिम होईल. आरक्षण निश्चित झाल्यानंतर काही दिवसांतच प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर होईल. मतदार यादी ऑगस्टपर्यंत अंतिम होईल, अशी शक्यता आहे. त्यानंतर सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यात निवडणुकांचा धुरळा उडणार आहे.