

प्रयाग चिखली, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील रजपूतवाडी नजीक हॉटेल ग्रीन फिल्डजवळ पिकअप गाडी आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. कपिल आकाराम माने (वय ३०, रा. केर्ली, जोतिबा रोड) असे मृत तरूणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. ३१) दुपारी एक वाजता घडली. (Kolhapur Accident News)
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी एक वाजता मृत कपिल हा कोल्हापूरहून केर्ली गावाकडे दुचाकीवरून जात होता. हॉटेल ग्रीन फिल्ड समोर अचानक त्याच्या मोटरसायकलची धडक रत्नागिरीकडून कोल्हापूर कडे येणाऱ्या पिकअप गाडीशी झाली. यावेळी तो फरकटत जाऊन रस्त्यावर पडला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. (Kolhapur Accident News)
कपिल याचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. तो फाइव्ह स्टार एमआयडीसीमध्ये कामास होता. त्याचे वडील मेंढपाळ आहेत. त्याने आज कामानिमित्त सुट्टी घेतली होती. घटनास्थळाजवळच केर्ली गाव असल्यामुळे त्याचा भाऊ कुमार माने याच्यासह तरुण व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. करवीर पोलिसांनी पंचनामा केला. पिकअप गाडीचा चालक मिलिंद शांताराम सावंत (रा. हरपवडे, देवरुख, ता. संगमेश्वर ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक निवास पवार करत आहेत.