

कोल्हापूर : राजारामपुरी येथील बांधकाम व्यावसायिकाने उजळाईवाडी (ता. करवीर) येथील एका लॉजमध्ये गळफास घेऊन जीवन संपविले. परशराम कामाण्णा रेमानिचे (वय ५३, रा. वर्षानगर, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. व्यवसायातील आर्थिक अडचणीमुळे रेमानिचे यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. सोमवारी (दि. १५) रात्री दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली.
रेमानिचे सोमवारी दुपारी उजळावाईवाडी येथील लॉजवर थांबले होते. रात्री दहाच्या सुमारास लॉजमधील कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद आला नाही. यामुळे कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती गोकुळ शिरगाव पोलिसांना दिली. पोलिसांना रेमानिचे यांनी पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. बेशुद्धावस्थेत त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. रेमानिचे यांच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ असा परिवार आहे.