

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासाठी भरघोस विशेष निधी द्या, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. कोल्हापूर हद्दवाढीसह जिल्ह्याला ‘पर्यटन हब’चा अधिकृत दर्जा, अंबाबाई तीर्थक्षेत्र पार्किंग, शहरातील भुयारी मार्ग, उड्डाणपूल, आंतरराष्ट्रीय फूटबॉल स्टेडियम उभारणी आदींसह इतर मागण्यांचा त्यात समावेश आहे.
महायुतीच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शहरात शाश्वत विकासाची पावले उचलली जात आहेत. परंतु, अद्यापही शहरातील प्रमुख मुलभूत प्रश्न प्रलंबित आहेत. खंडपीठ, कन्व्हेन्शन सेंटर, आय.टी. पार्क, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास या प्रयोजनांमुळे शहरात येणाऱ्या पर्यटक, भाविकांच्या संख्येत अगणिक वाढ होणार आहे. शहराची सद्यस्थिती अत्यंत दाटीवाटीची असल्याने भविष्यात वाहतूक, पार्किंग या समस्येत आणखी भर पडणार आहे. त्यामुळे हद्दवाढ होऊन अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत शिवाजी स्टेडियम येथे भुयारी बहुमजली पार्किंग व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. सदर पार्किंग भुयारी मार्गाद्वारे महामार्गास सलग्न करावा. जिल्ह्याला पर्यटन हबचा अधिकृत दर्जा द्यावा. कोल्हापूरला फूटबॉल वेडे शहर म्हटले जात असून, खेळाडूंच्या तंत्रशुद्ध प्रशिक्षण आणि सरावासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम व ॲकॅडमी स्थापन करावी, असेही आ. क्षीरसागर यांनी निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात विविध मागण्या
गृहमंत्री शहा यांना दिलेल्या निवेदनात आ. क्षीरसागर यांनी विविध मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये कोल्हापूर हद्दवाढीसह जिल्ह्याला ‘पर्यटन हब’चा अधिकृत दर्जा, अंबाबाई तीर्थक्षेत्र पार्किंग, शहरातील भुयारी मार्ग, उड्डाणपूल, आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम उभारणी आदी मागण्यांचा समावेश आहे.