

इचलकरंजी : महाराष्ट्रातील साखर उद्योगाला नवी उभारी देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा आणि पुण्यात प्रत्येकी दीड हजार कोटीप्रमाणे तीन हजार कोटी रुपयांचे दोन सहकारी तत्त्वावरील प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी केली.
इथेनॉल, सीबीजी गॅस, सायट्रिक अॅसिड निर्मिती आणि साखर उद्योगासाठी आवश्यक यंत्रसामग्रीच्या उत्पादनातून होणार्या या प्रकल्पामुळे साखर कारखान्यांना उत्पन्नाचे नवे स्रोत आणि सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी साखर कारखान्याचा नामविस्तार सोहळा आणि महायुतीची सभा इचलकरंजीत गृहमंत्री शाह यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.