

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या कामाला आता गती आली आहे. मंडपाचे खांब बसवल्यानंतर त्याचा वरील भाग बसवण्यास शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला. मंडपाच्या कामाला गती आली असून, येत्या नवरात्रोत्सवापूर्वी मंडपाचे बहुतांशी काम पूर्णत्वाला जाईल, असा विश्वास पुरातत्त्व विभाग आणि मंदिर प्रशासनाने व्यक्त केला आहे.
अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचे काम नव्याने केले जात आहे. या कामाला आता गती आली आहे. मंडपाच्या पायाचे सर्व खांब बसवून पूर्ण झाले आहेत. यानंतर शुक्रवारपासून या खांबावरील मंडपाच्या वरील भाग बसवण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. मोठ्या क्रेनच्या साहाय्याने हे भाग बसवण्यात येत आहेत. नवरात्रीच्या पूर्वी गरुड मंडपाचा बहुतांश भाग पूर्ण करण्याचा पुरातत्त्व विभाग आणि मंदिर प्रशासन यांचा प्रयत्न आहे.
मंदिरात जतन आणि संवर्धनाचे काम चालू आहे. यात मंदिर परिसरात असलेल्या उपदेवता, तसेच ओवर्यांची डागडुजी करण्यात येत आहे. ओवर्यांवरील जुना सिमेंटचा थर, गिलावा काढून मूळ पाषाण(दगड) मोकळे केले जात आहेत. त्यामुळे प्राचीन वास्तुकला पुन्हा स्पष्ट दिसणार आहे. याच समवेत मंदिरातील द्वार, तसेच अन्य खराब झालेले लाकूड बदलण्यात येत असून, तेथे सागवानी लाकूड बसवण्यात येत आहे. ओवर्यांच्या भिंतींमधील खराब झालेल्या चिरा या चुन्याच्या साहाय्याने परत भरण्यात येत आहेत.