

Kasari river water level
सुभाष पाटील
विशाळगड : कासारी धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे, धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या धरणातून १२०० क्युसेक वरून १८०० क्युसेक इतका विसर्ग कासारी नदीपात्रात सोडला जात आहे. यामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत कासारी धरण पाणलोट क्षेत्रात १६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली असून धरण सध्या ९४ टक्के भरले आहे. धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता २.७७ टीएमसी आहे, त्यापैकी २.६२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच तारखेला झालेल्या पावसापेक्षा यावर्षी कमी पाऊस झाला असला, तरी सध्याच्या जोरदार पावसामुळे धरण लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.
शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यांसाठी वरदान ठरलेल्या कासारी (गेळवडे) धरणात गेल्या २४ तासांत २८ दलघफुने पाणीसाठा वाढला असून, धरणात सध्या २११९ क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे. हे धरण २१ शाहूवाडी व ४१ पन्हाळा तालुक्यातील गावांना पिण्याचे पाणी आणि सिंचन पुरवते. आजपर्यंत धरण परिसरात ३९३१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच दिवशी ४११९ मिमी पाऊस झाला होता. या धरणाखालील सुमारे ९ हजार ४५८ हेक्टर शेती सिंचनाखाली आहे. कासारी नदीवर जागोजागी सुमारे १४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत.
वाढलेल्या विसर्गामुळे कासारी नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये यवलूज, पुनाळ-तिरपन, ठाणे-आळवे, कांटे, वालोली, बाजारभोगाव, पेंढाखळे, करंजफेण, कुंभेवाडी, आणि सोष्ठवाडी येथील बंधारे पाण्याखाली आहेत. या पार्श्वभूमीवर, कासारी धरण प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आणि नदीपात्रात किंवा आसपास न जाण्याचे आवाहन केले आहे. पावसाच्या स्थितीनुसार विसर्ग आणखी वाढू शकतो, अशी माहिती धरण प्रशासनाने दिली.
कासारी धरण पाणीसाठा नियंत्रित ठेवणेकरिता मंजूर धरणद्वार परिचलनानुसार धरणाच्या वक्र द्वाराद्वारे १५०० क्यूसेस व वीज निर्मिती गृहाद्वारे ३०० क्यूसेस असा एकूण १ हजार ८०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग कासारी नदीपात्रात सुरु आहे. तरी कासारी नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देणेत येत आहे.
- एस एस लाड, शाखाधिकारी, कासारी धरण