

कोल्हापूर : मंगळवार पेठेतील कैद्यांचे शेत परिसर कचरा डंपिंग स्टेशन बनला आहे. येथील महाराणी ताराबाई विद्यालयाच्या पिछाडीस कचऱ्याचे अक्षरश: सामाज्य झाले आहे. महापालिकेकडून येथून कचरा उठाव झाल्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी येथे कचऱ्याचे ढीग साचलेले असतात.
महापालिकेने पाच वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून कोल्हापूर शहर कोंडाळामुक्त जाहीर केले. यामुळे शहरातील सुमारे 1100 कोंडाळे हटवले. तसेच आरसी गाड्यासही स्क्रॅप केली गेली. तसेच ‘घर टू घर’ कचरा संकलनासाठी टिपरचा वापर सुरू केला. स्वच्छ भारत योजनेतून पहिल्या टप्प्यात 104 टिपर घेतले. यानंतर सीएनजीवरील 65 टिपर आले. काही दिवसांपूर्वी आणखीन 35 टिपर नवीन दाखल झाले. असे एकूण 204 टिपर आहेत. टिपरची संख्या वाढत असली तरी जुन्यातील 104 टिपर कालबाह्य होत आहेत. त्यामध्ये वारंवार बिघाड होत आहे. तसेच प्रभागामध्ये नियमित टिपर येत नसल्याच्या तक्रारी आहेत, तर काही प्रभागांत अवेळी टिपर येतात. यामुळे नोकरी, व्यवसायाला गेलेले टिपरमध्ये कचरा टाकू शकत नाहीत. रात्री रस्त्यावरच कचरा टाकला जातो.
कैद्यांचा शेत परिसर रिकामा आहे. त्यामुळे येथे रात्रीच्या वेळी वाहनधारक सोडले तर नागरिकांची वर्दळ फार कमी असते. यावेळी मंगळवार पेठेसह शहरातील इतर परिसरातील नागरिक येथे कचरा टाकून जातात. बांधकामाची भरही टाकली जाते. महापालिका ट्रॅक्टरमधून येथील कचरा उठाव करते; परंतु पुन्हा या ठिकाणी कचरा जमा होतो. दरवेळी येथे कचऱ्याचे सामाज्य होत असून लाईन बाजारला ज्याप्रमाणे कचरा डंपिंग होतो, तशीच येथे स्थिती आहे.