चंदगड, पुढारी वृत्तसेवा : चंदगड तालुक्याची हरितक्रांती करणारा जंगमहट्टी प्रकल्प शुक्रवारी (दि.४) दुपारी ३ वाजता पूर्ण क्षमतेने भरला. चंदगड तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून कोसळणाऱ्या दमदार पावसाने शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. धरण तुडूंब झाल्याने शेतकऱ्यांनीही आनंद व्यक्त केला. धरणातून प्रति सेकंद १४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
ऑगस्ट महिना उजाडला तरी या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली नव्हती, त्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंतेत होते. मात्र आता हे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून त्यामध्ये ७२६.२० दलघफू पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी १५ जुलै रोजी धरण भरले होते. यावर्षी भरण्यास विलंब झाला. तालुक्यातील फाटकवाडी वगळता सगळीच धरणे भरण्यास एक ते दीड महिन्याचा कालावधी लागला. घटप्रभा व जांभरे प्रकल्पावर वीज निर्मितीचे काम सुरू असल्याने या ठिकाणी प्रति सेकंद ९४२१ ने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील लघु पाटबंधारे प्रकल्प भरण्यास विलंब झाला आहे.
ऊसाला चांगला भाव मिळू लागल्याने सहकारी व खाजगी इरिगेशन योजनेला चालना मिळून डोंगराळ भागाने ऊस पिकांच्या माध्यमातून हिरवा साज परिधान केला आहे. मुबलक पाण्याच्या उपलब्धतेने आंतरपिकांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. सर्व लघु पाटबंधारे तलावांच्या सिंचनाखाली ८५८८ हेक्टर इतके क्षेत्र आहे. जंगमहट्टी ३७०० हेक्टर, घटप्रभा ४२९८ हेक्टर क्षेत्र आहे. गेल्या दशकात शेती उद्योगाच्या वाटचालीवर दृष्टीक्षेप टाकताना पाणी प्रकल्पाने कायापालट घडवून आणण्यात मोठे योगदान दिले आहे. मुबलक पाणीसाठा झाल्याने पिण्याच्या पाण्याची गरज पूर्णत्वास जाण्यास मदत झाली आहे.