

विनोद सावंत
कोल्हापूर : धोकादायक चेंबर, फुटलेले पेव्हिंग ब्लॉक, अतिक्रमणाचा विळखा, अशी विदारक स्थिती आयआरबी कंपनीने शहरात केलेल्या रस्त्यांच्या फुटपाथची झाली आहे. महापालिकेचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. रात्रीच्या वेळी चेंबरमध्ये पडण्याचा धोका आहे. तसेच, फुटपाथवर अतिक्रमण असल्याने रस्त्यावरूनच पादचाऱ्यांना ये-जा करावी लागत आहे. यामुळे दुर्घटना घडल्यानंतरच मनपा प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
कोल्हापूर शहरात आयआरबी कंपनीच्या माध्यमातून 2008 मध्ये रस्ते विकासाचा प्रकल्प सुरू केला. याअंतर्गत 49.9 कि.मी.चा रस्ता असून, संपूर्ण काम 2012 मध्ये पूर्ण झाले. शहरांतर्गत रस्त्यांसाठी टोल वसुलीला कोल्हापूरकरांनी विरोध दर्शवला. 2015 मध्ये युती सरकारने तो पुन्हा विकत घेण्याचा (बायबॅक) निर्णय घेतला. कंपनीचे 450 कोटी भागवून कोल्हापूर शहर टोलमुक्त केले. यानंतर मनपाकडे रस्त्यांची जबाबदारी आली. परंतु, मनपाकडून या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे. 12 वर्षांमध्ये आयआरबीच्या या रस्त्यांवरील फुटपाथची दुरवस्था झाली आहे. तावडे हॉटेल ते कावळा नाका व रेणुका मंदिर ते हॉकी स्टेडियम मार्गावरील फुटपाथवरील पेव्हिंग ब्लॉक खराब झाले आहेत. तर चेंबर उघड्यावर असून, धोकादायक बनले आहेत. याचबरोबर फुटपाथवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. काही विक्रेते शहराबाहेरील असून, त्यांनी फुटपाथवरच दुकाने थाटली आहेत.