

कोल्हापूर : ऐन मार्च महिन्यात गारांचा मारा आणि मान्सूनपूर्व धुवाँधार सरींनी कोल्हापूरला झोडपले. बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास न्यू पॅलेस, कसबा बावडा, रमणमळा, कदमवाडी परिसरात गारांचा जोरदार वर्षाव झाला आणि बघता बघता रस्त्यांवर गारांची पांढरी शुभ चादर पसरली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. सखल भागांना तळ्याचे स्वरूप आले होते. पावसाने हजेरी लावल्याने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठांमध्ये दैना उडाली.
वादळी वाऱ्यामुळे न्यू शाहूपुरीत एक लहान झाड पडले, तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली. पाडव्याच्या खरेदीसाठी कुंभार गल्ली, महाद्वार रोड आणि राजारामपुरी परिसरात ग््रााहकांची मोठी गर्दी होती; मात्र अचानक आलेल्या पावसाने विक्रेत्यांची तारांबळ उडाली आणि अनेक ठिकाणी सजावटीच्या वस्तूंचे नुकसान झाले.
जिल्ह्याला हवामान विभागाने बुधवारी वादळी पावसासह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यामुळे शहरात दुपारपर्यंत उन्हाचा तडाखा होता. दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. सायंकाळी नभ दाटून आले आणि सोसाट्याचा वारा सुटला. बघता बघता अनेक भागांमध्ये गारांचा पाऊस सुरू झाला. काही वेळातच विजांच्या कडकडाटात धुवाँधार सरींनी हजेरी लावली. शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. बालचमूंनी पावसाचा आनंद लुटत घराबाहेर गारा गोळा करण्यास गर्दी केली होती. अचानक झालेल्या पावसाने कोल्हापूर शहरातील राजारामपुरी कसबा बावडा, भाऊसिंगजी रोड, सायबर चौक परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. शहरासह जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. शिरोलीत गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. भुदरगड तालुक्यातील शेळोली परिसरात मोठी गारपीट झाली. हातकणंगले तालुक्यातील टोप, संभापूर, तासगाव परिसरालादेखील अवकाळीचा तडाखा बसला.
कोल्हापूर नव्हे... मिनी काश्मीर
कोल्हापुरातील कसबा बावडा, न्यू पॅलेस, नागाळा पार्क, कदमवाडी येथे मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाला. गारांची चादरच रस्त्यांवर पसरली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाला. ‘कोल्हापूर नव्हे मिनी काश्मीर’ अशा कॅप्शन देत अनेकांनी गारपिटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
शहरासह ग््राामीण भागातही वीज गायब
अचानक झालेल्या पावसाने कोल्हापूर शहरातील राजारामपुरी, कसबा बावडा, भाऊसिंगजी रोड, सायबर चौक, तर तांबवे, कडगाव आणि शेळोली या गावांसह अन्य काही गावांतील वीजपुरवठा गायब झाला. यामुळे नागरिक, व्यापारी आणि अन्य घटकांची काही काळ गैरसोय झाली.