

Gokul Shirgaon Goat Electrocution
कोल्हापूर : गोकुळ शिरगाव येथील महालक्ष्मी नगर, माळवाडी परिसरात महावितरणच्या निष्काळजीपणामुळे तीन गाभण शेळ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत झालेल्या शेळ्या गाभण असल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
येथील रहिवासी यशवंत शामराव जाधव यांच्या मालकीच्या तीन शेळ्या नेहमीप्रमाणे परिसरात चरायला गेल्या होत्या. यावेळी महावितरणच्या विद्युत खांबामध्ये वीज प्रवाह उतरल्याने शेळ्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. यात तिन्ही शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेत त्यांचे अंदाजे 60 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे निष्पाप जनावरांचा बळी गेल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.