

कोल्हापूर : गांधी मैदान परिसरातील पाणी काढण्यासाठी उभा मारुती चौकात चॅनेलचे काम सुरू केले होते. मात्र ते काम अर्धवट सोडून दिल्याने मोठा खड्डा तयार झाला असून त्यात पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या तक्रारींनंतर महापालिकेने तात्पुरते पाणी बाहेर काढले. मात्र, पुन्हा काम ठप्प झाल्याने संतप्त नागरिकांनी मंगळवारी महापालिकेच्या ऑफिसमध्ये घुसून संबंधित अभियंता महादेव फुल्लारी यांना घेराव घालून जाब विचारला.
यावेळी उपायुक्त व अधिकारी घटनास्थळी आले. अर्धवट कामाची पाहणी करून त्यांनी लवकरात लवकर काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. परंतु नागरिकांचा रोष काही कमी झाला नाही. गांधी मैदान परिसरातील नागरिकांना दुर्गंधी, खड्डा आणि साचलेल्या पाण्याचा त्रास द्यायचा आणि काम मात्र 40 टक्क्यातच थांबवायचे, हे जनतेशी प्रचंड अन्याय आहे, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला. दरम्यान, दुपारी गटारातील पाणी वाहण्यासाठी चॅनेल काढताना अंडरग्राऊंड विजेची तार तुटली. परिणामी या भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली. या आंदोलनात कॉम्रेड चंद्रकांत यादव, अनिल चव्हाण, राजेंद्र खद्रे, जयंत मिठारी, अमर जाधव यांच्यासह भागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.