

गुडाळ : राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द येथील चिंचमाई मंदिर परिसरातील दामोदर चौगले यांच्या आंबा बागेत शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या पिंजर आणि गवताच्या पंधरा गंज्यांना शॉर्ट सर्किटने आग लागून शेतकऱ्यांची हजारो रुपयांची वाळकी वैरण जळून खाक झाल्याची दुर्घटना मंगळवारी दुपारी घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तारळे खुर्द येथील दामोदर चौगुले यांच्या आंब्याच्या बागेवरून वीज वितरण ची वाहिनी गेलेली आहे. आंबा बागेतील रिकाम्या जागेत शेतकऱ्यांनी पिंजर आणि गवताच्या गंज्या रचलेल्या आहेत. मंगळवारी दुपारी साडेतीन च्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन गवत गंजीवर ठीणग्या पडल्या आणि आग लागली. आग आणि धुराचे लोळ पाहून ग्रामस्थांनी भोगावती कारखान्याच्या अग्नीशमन दलाला वर्दी दिली.
अग्निशमन दल येईपर्यंत पंधरा गंज्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. तर नेताजी दामोदर चौगले यांच्या मोहोर आलेल्या अनेक हापूस आंबा कलमांना आगीची झळ बसून मोठे नुकसान झाले. या आगीत तानाजीराव चौगले,अशोक चौगले, आनंद साबळे, मारुती पाटील,श्रीकांत पाटील, शिवाजी पाटील, दत्तात्रय कदम या शेतकऱ्यांचे मिळून सव्वा लाखाहून अधिक नुकसान झाले.
घटनास्थळी भेट देऊन वीज वितरण चे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी विश्वास शेणवी, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती नाईकनवरे, कृषी अधिकारी राहुल पाटील यांनी नुकसानीचा पंचनामा केला. दुधाळू जनावरांसाठी मोठे कष्ट करून कापणी, वाळवणी करून रचून ठेवलेली वाळकी वैरण जळून खाक झाल्याने घटनास्थळी आलेल्या शेतकरी महिलांना अश्रू अनावर झाले.