

सरूड : शाहूवाडी तालुक्यातील नदीकाठाच्या गावातील शेतीपंपाचा विजपुरवठा रात्री ऐवजी सरसकट दिवसाच्या वेळेत करावा, अन्यथा शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सरूड, कापशी, भेडसगांव, कोतोली, रेठरे परिसरातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य अमरसिंह पाटील-भेडसगांवकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी शाहूवाडीत महावितरण कर्यालयात उपअभियंता प्रवीण कुंभारे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे कि, तालुक्यात सद्या ऊसतोडणी हंगाम समाप्तीच्या मार्गावर असून ऊसाचे सुरु तसेच खोडवा पीक व इतर हंगामी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी सिंचनावर विशेष भर द्यावा लागत आहे. महावितरणकडून मागील काही महिन्यांपासून शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा सुरळीत सुरु असताना गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा रात्र आणि दिवस अशा ठराविक दोन सत्रात वीज पुरवठा करण्याचे धोरण अवलंबले आहे. साहजिकच सुरक्षेच्या दृष्टीने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.
दरम्यान, तालुक्याच्या सर्वच भागात बिबट्या, गवे, रानडुक्कर आदी जंगली प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. रात्रीअपरात्री अंधारात शेतीला पाणी देणे शेतकऱ्याच्या जीवावर बेतत आहे. त्रस्त शेतकऱ्यांवर शेती सोडून देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. यासाठी कृषी पंपासाठीचा रात्रीच्या वेळी होणारा विजपुरवठा पूर्ववत दिवसाच्या वेळेत करावा, अशी आग्रही मागणीही शेतकऱ्यांनी निवेदनात केली आहे.
सदरच्या मागणी संदर्भात सकारात्मक विचार व्हावा व महावितरणकडून तातडीने कार्यवाही व्हावी अन्यथा शाहूवाडी-पन्हाळ्याचे माजी आ. सत्यजित पाटील, उदय साखरचे चेअरमन मानसिंगराव गायकवाड, शेकाप नेते भाई भारत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शाहूवाडी तहसीलदार कार्यालयासह वीज वितरण कार्यालयावर कृषी पंपधारकांसह शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाच्या शेवटी दिला आहे. निवेदनावर अमरसिंह पाटील, हंबीरराव पाटील, दिलीप पाटील-कोतोलीकर, रंगराव गुरव, बाजीराव डांगे, महादेव कर्नाळे, संजय पाटील, शरद पाटील, मारुती पाटील, अमर पाटील, अशोक पाडळकर, मनिष तडवळेकर आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.