

कोल्हापूर : संजय गांधी निराधार पेन्शन योजनेतील जाचक तांत्रिक अटी आणि प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यातील तब्बल 11 हजार 77 दिव्यांगांची पेन्शन तीन महिन्यांपासून रखडल्याच्या निषेधार्थ प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पेन्शन बचाव आक्रोश मोर्चा काढला. जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांच्या नेतृत्वाखालील मोर्चात दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महावीर उद्यान येथून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी ‘पेन्शन आमचा अधिकार, पेन्शन आमच्या हक्काची, अपंग एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. प्रलंबित पेन्शन तत्काळ जमा करावी, जाचक अटींमध्ये शिथिलता आणावी आणि दिव्यांगांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या मोर्चात अरुण विभुते, जयश्री शिंदे, शैलेश वापीकर, सईद पिरजादे, प्रदीप आयगुळे, संजय पोवार, रावसाहेब मिठारी, रंजना गुलाईकर यांच्यासह दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.
सन्मानाने दिव्यांग बांधव भारावले
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिव्यांग बांधवांची आपुलकीने चौकशी केली. त्यांना खुर्चीशेजारी बसवून समस्या जाणून घेतल्या. या सन्मानाने दिव्यांग बांधव भारावून गेले. प्रशासनातील देवमाणूस भेटला, अशी प्रतिक्रिया दिव्यांग बांधवांतर्फे देवदत्त माने यांनी व्यक्त केली.