कोल्हापूर : दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. सलग दहा वर्षे राज्यात द्वितीय येण्याचा मान पटकावत कोल्हापूरने निकालात स्थान कायम ठेवले आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल 95.47 टक्के लागला तरी गतवर्षीच्या 96.87 टक्केच्या तुलनेत यंदा 1.40 टक्केने निकालात घट झाली. यंदाही परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. मुलांच्या उत्तीर्णतेच्या तुलनेत 3.50 टक्के मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाच्या सचिव अनुराधा म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2026 मध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. कोल्हापूर विभागातील 2 हजार 476 शाळांमधील एक लाख 29 हजार 6 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी एक लाख 23 हजार 171 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्प्रविष्ट विद्यार्थ्यांमध्ये विभागात 1644 पैकी 511 जण उत्तीर्ण झाले. कोल्हापूर विभागात 69 हजार 601 पैकी 65 हजार 330 मुले उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे प्रमाण 93.86 टक्के आहे. 59 हजार 405 पैकी 57 हजार 841 मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्णतेची टक्केवारी 97.36 आहे.
गेल्या 5 वर्षांतील सर्वात कमी निकाल
पुणे : कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलजबजावणी आणि सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली द्यावी लागलेली परीक्षा यामुळे यंदा दहावीचा गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी निकाल (92.09 टक्के) लागला आहे. निकालात नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली असून विभागात कोकणचा सर्वाधिक (97.62 टक्के), तर छत्रपती संभाजीनगरचा सर्वात कमी (88.41 टक्के) निकाल लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल 2.01 टक्क्यांनी कमी लागला असून बारावीपाठोपाठ दहावीच्या निकालात गुणवंतांमध्ये घट झाली असल्याचे दिसून आले आहे. राज्यात केवळ 179 विद्यार्थ्यांना शतप्रतिशत, तर 65 हजार 297 विद्यार्थ्यांनाच 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सकाळी 11 वाजता निकाल जाहीर केला.