

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध गटांतील ९४३ संस्था चौकशीच्या फेर्यात आल्या आहेत. संस्थांबाबत जिल्हा उपनिबंधक, आरबीआय आणि नाबार्डकडे गोकुळमधील तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी तक्रारी केल्या आहेत. तक्रारींवर शासन पातळीवर योग्य न्याय न मिळाल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचे बेलवाडे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे गोकुळप्रमाणेच जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूकही पुढील काळात न्यायालयीन कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत ५ जानेवारी २०२७ मध्ये संपत आहे. तत्पूर्वी सहकार विभागाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. बँकेच्या पात्र १२ हजार ८९१ संस्थांकडून ठराव मागविण्याची प्रक्रिया ११ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. सध्या संस्थांना ठरावाचा मसुदा पाठविला असून चालू आठवड्यापासून संस्थांचे ठराव दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. ठराव दाखल करण्यासाठी ९ सप्टेंबरपर्यंत मुदत असणार आहे.
जिल्हा बँकेचे राजकारणही तापणार
आरबीआयकडे झालेल्या तक्रारीमधूनच अन्नपूर्णा कारखान्याला केलेल्या कर्जपुरवठ्यावरून बँकेला १३ लाख दंड झाला. पुढील काळत तक्रार केलेल्या ९४३ संस्थांवरून जिल्हा बँकेचे राजकारणही तापण्याची शक्यता आहे.
जिल्हा उपनिबंधकांकडून चौकशीचे आदेश
जिल्ह्यातील ९४३ संस्थांनी वैधानिक लेखापरीक्षण, निवडणुका व इतर कायदेशीर अनुपालन न केल्यामुळे त्या निष्क्रिय अवस्थेत असताना एकही संस्था निष्क्रिय नाही असे वस्तुस्थितीविरोधी अहवाल सादर केले आहेत. त्यामुळे संबंधित तालुका सहनिबंधकांची चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी बेलवाडे यांनी केली आहे. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी संबंधित संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेऊन संस्थांचे लेखापरीक्षण, निवडणूक, वार्षिक विवरणपत्र, कार्यरत स्थिती आदी बाबी तपासण्याचे आदेश सहायक निबंधकांना दिले आहेत.