

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या विकासासाठी हद्दवाढ झालीच पाहिजे, हद्दीच्या प्रस्तावित गावांतील जनतेच्या काही अडचणी आहेत. पण त्या सोडविल्या जातील. याची शंभर टक्के ग्वाही मी येथील लोकप्रतिनिधींना देतो, अशा शब्दांत रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हद्दवाढीबाबत आग्रही भूमिका मांडली. शेंडा पार्क येथे खंडपीठासाठी ७५ एकर जागा देत आहोत. त्यासह प्रस्तावित आय.टी. पार्क, कन्व्हेंशन सेंटर लवकरच सुरू होणार असून यामुळे दररोज २० ते २५ हजार नागरिकांची अधिकची ये-जा होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर अधिक सुनियोजित करायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर शहरातील १८५० कोटींच्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने झाले. प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूर कुस्तीचे माहेरघर आहे. येथे फुटबॉल, हॉकीचेही फॅन आहेत. क्रिकेटही मोठ्या प्रमाणात खेळले जाते. राज्य शासनाने क्रिकेट स्टेडियमसाठी जागा दिली आहे. बीसीसीआयच्या माध्यमातून येथे अत्याधुनिक स्टेडियम बांधण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही फडणवीस यांनी सांगितले.
अतिरिक्त ४० टीएमसी पाणी दुष्काळी भागात वळवणार
कोल्हापूर : पुराद्वारे वाहून जाणारे ४० टीएमसी पाणी कॅनॉलद्वारे दुष्काळी भागात वळवले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले. कोल्हापूर आणि सांगलीत पुरावर मात करण्यासाठी जागतिक बँकेच्या साह्याने पुराच्या पाण्यावर उपाययोजना करण्यासाठी ३२०० कोटी रुपयांचा महाराष्ट्र रेझिलिएन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम तयार केला. या प्रकल्पाला ‘मित्रा’च्या माध्यमातून मान्यता मिळवली असून पूर नियंत्रणाच्या दृष्टीने काम करण्यात येणार आहे.