

दत्तवाड : दत्तवाड येथील कोटलिंग रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून हा रस्ता लोकप्रतिनिधींनी त्वरित करावा अन्यथा व्यापक जन आंदोलन करण्याचा इशारा भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राजगोंडा पाटील यांनी दिला आहे.
दत्तवाड येथील बहुचर्चित कोटलिंग रस्ता ५ किलोमीटर पैकी ४ किलोमीटर हा गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत खराब झाला असून वारंवार या रस्त्यावर विशेषतः ऊस गळीत हंगामात अपघात होत आहेत. नुकतेच दोन-तीन दिवसांपूर्वी एक ऊस वाहतूक करणारे ट्रॉली पलटी होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या परिसरात २०० ते ३०० शेतकऱ्यांची सुमारे ७०० ते ९०० एकर शेती आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत.
गेल्या १३ ते १४ वर्षापासून भाजप कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष किसान मोर्चा चे राजगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांकडून रस्त्यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा करत आहेत. यापूर्वीच्या आमदार ,खासदारांनी अगदी तुटपुंजानिधी देऊन पाच किलोमीटर पैकी केवळ एक किलोमीटर रस्ता केला आहे. उर्वरित रस्ता या भागातील शेतकऱ्यांनी आठ ते नऊ वेळा वर्गणी काढून दुरुस्त केला आहे. या रस्त्यावर वारंवार उसाचे ट्रॅक्टर, ट्रॉली ,टेम्पो, दोन चाकी गाड्यांचे अपघात होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
खराब रस्त्यामुळे गेल्या चार-पाच वर्षापासून कोटलिंग खडकोळी भागात ऊसतोड करण्यासाठी कोणत्याही कारखान्याचे मशीन अथवा टोळ्या लवकर येत नाहीत व शेवटी पैसे देऊन विनंती करून ऊसतोड करावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे या भागाचे खासदार व तालुक्याचे आमदार यांनी या रस्त्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा शेतकऱ्यामार्फत आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी आप्पासो सिदनाळे ,आलगोंडा पाटील ,विकास सवळे, अनिल टोपाई ,शावगोंडा पाटील, सचिन हेमगिरे, यशवंत पाटील, ए . ए पाटील, कुमार आडे, राजू चौगुले, संजय पाटील आदी उपस्थित होते.