

नूल : आईचा खून झाल्याने आणि या हत्येप्रकरणी वडील तुरुंगात गेल्याने चितारी कुटुंबातील दोन कोवळ्या मुलांवर दुहेरी संकट कोसळले आहे. शिक्षणासाठी बाहेरगावी असलेल्या या मुलांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
रक्ताच्या थारोळ्यात चित्रांजली यांचा मृतदेह पडला होता. घटनास्थळी पडलेला विळा पोलिसांनी जप्त केला. घाबरलेला भीमाप्पा शेतात लपून बसला. उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, पोलीस निरीक्षक सतीश होडगर, उपनिरीक्षक रमेश मोरे यांनी तत्काळ घटना स्थळास भेट देऊन आरोपीस अटक केली.
आईची हत्या झाली, तर वडील तुरुंगात गेल्याने दोन्ही मुले एका क्षणात आई-वडिलांच्या मायेपासून वंचित झाली आहेत. चितारी कुटुंबाच्या गोट्यात अनेक जनावरे आहेत. आता या जनावरांची जबाबदारी कोण स्वीकारणार, हा प्रश्नही निर्माण झाला आहे. चित्रांजली यांच्या पश्चात पती, सासू, मुलगा, मुलगी, नणंद असा परिवार आहे.
दरम्यान, या हत्येमागे कौटुंबिक कलहासह अन्य काही कारण आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत. नूल परिसरात घडलेल्या या थरारक हत्याकांडामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, कौटुंबिक वादाचे इतके भीषण रूप धारण झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस पाटील परशराम सरनाईक यांनी फिर्याद दिली.