

म्हासुर्ली : कोनोली पैकी फालेवाडा येथे शनिवारी (दि.2) सुरज फाले या युवकाचा खुन झाला. राधानगरी पोलीसांकडून रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याचे काम चालू होते. मृत सुरज याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार तपास सुरू आहे. खुनातील संशयित आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली असून, आणखी संशयितांचा शोध सुरू आहे.
खुनाच्या घटनेवेळी एका चार चाकी गाडीत पोलिसांना 3 बंदुका मिळून आल्या असल्याने बाजारीवाडा परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. त्यातच रविवारी (दि.3) रात्री बाजारीवाडा फाट्यावरील तिकटीवर अज्ञाताने लिंबु मिरचीचा अघोरी प्रकार केल्याने परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे .
फालेवाडा येथील खुनाच्या घटनेचा पोलीसांनी तपास सुरू केला आहे. त्यातील महत्वाचे काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यानुसार भावकीतील नव्वद एकर जमिन, त्यांच्यातीलच कोल्हापूर येथे वास्तव्यास असणाऱ्या व्यक्तीने त्यातील तीस एकर जमिनीची केलेली विक्री तर उरलेल्या साठ एकर जमिनितील वाटणीवरूण या कुटुबांत वारंवार खटके उडत होते. मयत सुरज याचा गुन्हेगारी प्रवृत्तीशी संबंध असल्याचे तर आपल्या वागण्यातून तो नेहमीच येथे दहशत पसरवत असल्याचे बोलले जात आहे. या वादामुळे तेथील स्थानिक कुटुंबांतही दहशतीचे वातावरण होते. खुनाच्या प्रकाराने तर अधिक भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .
खुनाच्या दुसऱ्या दिवशीच रविवारी रात्रीच्या सुमारास बाजारीवाडा फाटा येथील तिकटीवर लिंबु मिरचीसह गुलाल , नारळ, टाचण्यासंह अघोरी प्रकार करण्यात आला आहे. हा प्रकार सकाळी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांच्या, तर फालेवाडा , बाजारीवाडा येथील लोकांच्याही निदर्शनास आला. त्यामुळे पुन्हाही या परिसरात खळबळ उडाली आहे. या अघोरी प्रकाराला फालेवाड्यावरील वादाची पार्श्वभूमी आहे की कोणी अज्ञात इसमाने स्वतःच्या मनसुब्यातून केलेला हा प्रकार आहे, याबाबत येथे लोकांतून उलट सुलट चर्चा चालू आहेत.
यापूर्वीही या तिकटीवर अशा अघोरी कृत्यांचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे असे केले जाणारे प्रकार हे कोण, कशासाठी व कोणत्या उद्देशातून करतात अशा प्रतिक्रिया समाजमनातून उमटत आहेत.