

दिलीप भिसे
कोल्हापूर : सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातील संघटित गुंडांच्या घुसखोरीमुळे कोल्हापूर, इचलकरंजीसह ग््राामीण भागात शांतता- सुव्यवस्थेचा अक्षरश: बट्ट्याबोळ झाला आहे. जीवघेण्या घातक शस्त्रांपाठोपाठ गावठी बनावटीचे पिस्तूल आणि अत्याधुनिक रिव्हॉल्व्हरचा खुलेआम वापर सुरू झाला आहे. गुन्हेगारी टोळ्यांची फोफावणारी दहशत सामान्यांच्या काळजाचा ठोका वाढविणारी ठरत आहे. जिल्ह्यात 12 महिन्यांत 30 पिस्तूल, जिवंत काडतुसांचा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. गतसप्ताहात इचलकरंजी येथील मध्यवर्ती चौकात सांगली रस्त्यावर थरार घडला. सांगलीतील गुन्हेगार ओमकार जितेंद्र कांबळे (रा. सांगलीवाडी) याच्यावर सराईत गुंडानी पिस्तुलातून गोळीबार करून थरार माजविला.
पिस्तूल सापडली तीसभर; मात्र हत्याऱ्यांची संख्या ढीगभर!
जानेवारी ते डिसेंबर 2025 या काळात 26, तर जानेवारी ते 15 मार्च 2026 काळात शहर, जिल्ह्यात 4 अशी एकूण गावठी बनावटीची 30 पिस्तूल पोलिसांच्या हाती लागली असली, तरी टोळ्यांच्या म्होरक्यांकडे यापेक्षा कितीतरी पटीने जीवघेणी हत्यारे कब्जात दिसून येताहेत. शहरातील काही मध्यवर्ती चौकात अथवा गुंडांचा वावर असलेल्या आश्रयस्थानांवर कोम्बिंग ऑपरेशन अथवा झाडाझडती घेतल्यास सराईत गुंडांच्या कब्जातून ढीगभर तरी घातक शस्त्रे हाताला लागतील, यात शंका नाही; मात्र त्यासाठी मानसिकता महत्त्वाची आहे.
गोळीबार... अनेक घटना...मात्र गांभीर्य नाही
कोल्हापुरात जरगनगर येथील मध्यवर्ती चौकात चार वर्षांपूर्वी एका तरुणावर गोळीबार करून त्याचा मध्यवर्ती चौकात मुडदा पाडण्यात आला होता. त्यानंतर बालिंगा येथील सराफ पेढीवरील दरोड्यात अंधाधुंद गोळीबार झाला होता. शिवाय दोनवडे फाट्याजवळ लॉज मालकावर झालेला अंधाधुंद गोळीबार... अशा एक ना अनेक घटना शहर, जिल्ह्यात घडलेल्या असतानाही पोलिस यंत्रणांना त्याचे गांभीर्य नाही. खासगी सावकरांसह वसुली एजंटांची दहशतही केवळ घातक शस्त्रांच्या धाकावरच चालते, याचेही भान असायला हवे.