

कोल्हापूर : जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य आणि प्रमुख महामार्गांवरील दोन्ही बाजूंची अतिक्रमणे येत्या १५ दिवसांत काढा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी शुक्रवारी दिले. या आदेशाचे पालन करत कार्यवाही केली नाही, तर संबंधित विभागावरच कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
डॉ. राठोड म्हणाले, रस्ते अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करणे आपल्या हातात आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या कामाला प्राधान्य द्यावे. अतिक्रमण काढण्याबाबत दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही, तर संबधित विभागांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल, त्यानंतर टप्प्याटप्याने कारवाई होईल.
महामार्ग मंत्रालय तसेच केंद्र सरकारच्या सेव्ह लाईफ फाऊंडेशनच्या सहकार्याने शंभर जिल्ह्यांत ‘झिरो फॅटलिटी डिस्ट्रीक’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये कोल्हापूरचाही समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातून राष्ट्रीय, राज्य आणि प्रमुख महामार्ग जातात. पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यात ५२ ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चिती करण्यात आली आहे. ही सर्व ठिकाणे पंधरा दिवसांत दुरुस्त करावीत. दुरुस्त झालेल्या ठिकाणी मी स्वतः पोलीस अधीक्षकांसमवेत भेट देणार असल्याचेही ते म्हणाले.