

कोल्हापूर : रंकाळा तलावातील प्रदूषित पाण्याची गंभीर दखल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी रंकाळा तलाव, पंचगंगा प्रदूषण या विषयावर झालेल्या बैठकीत त्यांनी रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी का रोखू शकत नाही, असा सवाल महापालिका अधिकाऱ्यांना केला. आजपर्यंत तलाव प्रदूषणमुक्तीसाठी काय उपाययोजना केल्या, अशी विचारणा करत रंकाळा प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करा, अशा सक्त सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, रंकाळ्यात सोडले जाणारे सांडपाणी दुधाळी ‘एसटीपी’कडे वळवावे. जलपर्णी असल्यास ती तत्काळ काढून टाका. पंचगंगा नदीत जलपर्णी वाढणार नाही याचीही दक्षता घ्या, नदी प्रदूषित करणाऱ्या जयंती नाल्यावरील कचरा तातडीने काढून घ्यावा. रंकाळ्याच्या भोवतीने खाद्यपदार्थ विक्रेते वाढले आहेत. तेथे पर्यटक अथवा स्थानिक नागलिक आल्यानंतर प्लेट, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या थेट रंकाळ्यात टाकत असल्याचे निदर्शनास येत आहे. असे घडू नये ही जबाबदारी विक्रेत्यांचीही आहे. त्यांनी कचरा टाकण्याची सोय करावी, ग््रााहकांनाही सूचना द्यावी. व्हाईट आर्मी, आपदा मित्रांची मदत घेऊन परिसरावर लक्ष ठेवावे, असेही जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले. कत्तलखान्यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन तेथील सांडपाणी नदीत मिसळणार नाही, अशी व्यवस्था करा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कोल्हापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, इचलकरंजीच्या आयुक्त पल्लवी पाटील, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखील घरग, प्रमोद माने, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड आदी उपस्थित होते.
पोलिस बंदोबस्त घ्या; पण एसटीपी पूर्ण करा
अमृत योजना दोन अंतर्गत इचलकरंजी, कोल्हापूर शहरात होणाऱ्या पाच एसटीपी प्रकल्याचाही आढावा घेतला. पोलिस बंदोबस्त घ्या पण एसटीपी पूर्ण करा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या.