

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या अनुषंगाने घोषणा केली होती. या अनुषंगाने राज्य शासनाने कागदपत्रांसह माहिती मागितल्यानंतर महापालिकेने तत्काळ ही माहिती पाठवली आहे. नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी विनोद कदम यांनी कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांना त्यासंदर्भात मंगळवारी (दि. ८) पत्र पाठविले होते. परिणामी, कोल्हापूर हद्दवाढीला गती मिळणार आहे.
कोल्हापूरची हद्दवाढ यापूर्वी झाली का? नव्याने अंमलबजावणी करायची व नवीन योजना तयार करायची का? नवीन शासन निर्णय व नवीन कायदा करायचा का? प्राधिकरणाची गरज आहे? असल्यास प्राधिकरणांची नावे व मान्यतेची स्थिती, केंद्र शासनाची मान्यता आहे का? असल्यास मंत्रालयाचे नाव, मान्यता व प्रशासकीय मान्यतेची सद्यस्थिती, आदी प्रश्न शासनाने महापालिकेला विचारले होते.
आठ गावांच्या हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवला
राज्य शासनाच्या मागणीनुसार महापालिकेने बुधवारी (दि. ९) सर्व माहिती भरून पाठविली. तसेच, कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत ५ ऑगस्ट २०२५ राेजी पाठविलेला उचगाव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, कळंबा, बालिंगा, उजळाईवाडी, पाडळी खुर्द, पाचगाव या ८ गावांचा प्रस्तावही सोबत जोडला आहे. या गावांची स्थापना, २०११ ची लोकसंख्या व सध्याची लोकसंख्या, ग्रा.पं. सदस्य, भौगोलिक क्षेत्रफळ, लोकसंख्येची घनता, दवाखान्यांची संख्या, गायरान क्षेत्र, ग्रा.पं.चा स्वनिधी, करवसुली आदी माहिती पाठविण्यात आली आहे.