कोल्हापूर : कोल्हापूर शहरात तब्बल ८५ इमारती धोकादायक स्थितीत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील ३४ इमारती ‘अत्यंत धोकादायक’ असून त्या कधीही पत्त्यासारख्या कोसळू शकतात. परिणामी या इमारती म्हणजे थेट मृत्यूचे सापळे बनल्या आहेत आणि त्या तातडीने जमीनदोस्त (निष्काषीत) करणे गरजेचे आहे. धोकादायक इमारतीमुळे शेकडो कुटुंबे मृत्यूच्या छायेत असून महापालिकेची नोटीस फक्त कागदावरच अशी स्थिती आहे.
दरवर्षी पावसाळा आला की महापालिका प्रशासनाकडून नोटिसा बजावण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. पण केवळ नोटिसा काढून प्रशासनाची जबाबदारी संपते का? या ३४ अतिधोकादायक इमारतींमध्ये आजही अनेक लोक जीव मुठीत धरून राहात आहेत किंवा त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार आहे. जर एखादी इमारत कोसळून निष्पाप नागरिकांचा बळी गेला, तर त्याची जबाबदारी महापालिका घेणार की घरमालक? शहराच्या मध्यवस्तीत आणि पेठांमध्ये अशा अनेक इमारती उभ्या आहेत, ज्यांच्या भिंतींना तडे गेले आहेत आणि स्लॅबचे तुकडे पडत आहेत.
कोल्हापुरातील धोकादायक इमारतींचे वर्गीकरण असे
३४ इमारती : अत्यंत धोकादायक, राहण्यास अयोग्य.
१८ इमारती : रिकाम्या करून दुरुस्ती गरजेची.
२२ इमारती : रिकाम्या न करता तातडीने दुरुस्ती आवश्यक.
११ इमारती : किरकोळ दुरुस्तीची गरज.