

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या तीन संचालकांकडून येथील एका मिळकतीचा टेरेस भाडेतत्त्वावर घेतल्याचा करार रद्द करण्याची मागणी केली आहे. मात्र, अन्य काही संचालकांकडून समितीमध्ये अशा पद्धतीनेच नातेवाईकांच्या नावावर मिळकती भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. आता या प्रकरणांचीही चौकशी होणार का, असा सवाल बाजार समिती वर्तुळातून उपस्थित होत आहे.
बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, भारत पाटील-भुयेकर आणि शेखर देसाई यांनी समितीच्या एका मिळकतीचे टेरेस 29 वर्षांच्या भाडेकरारावर घेतले. या व्यवहाराबाबत तक्रारी झाल्या. शिवसेना ठाकरे गटाच्या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधकांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना समितीचे सचिव तानाजी दळवी यांना केल्या. त्यानुसार दळवी यांनी सोमवारी अहवाल सादर केला. यावर जिल्हा उपनिबंधक पुढे काय कार्यवाही करणार, याकडे लक्ष असणार आहे.
अन्य व्यवहारांचीही चौकशी होणार
‘सापडला तो चोर’ अशा पद्धतीचा कारभार समितीमध्ये सुरू असल्याची चर्चा आहे. तीन संचालकांनी केलेल्या व्यवहाराप्रमाणे यामागे अन्य काही व्यवहार झाले आहेत. भाजी मार्केटमधील गाळा, मुख्य इमारत परिसरातील जागा, एकाच व्यक्तीच्या नावे 20 प्लॉट असेही व्यवहार झाले आहेत. अशा व्यवहारांचीही चौकशीही होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संचालक अपात्र होणार?
तीन संचालकांनी पदाचा गैरवापर करत नातेवाईकांच्या नावावर प्लॉट घेतले. त्यावर चौकशी अहवाल सादर केला आहे. यापूर्वी अशाच पद्धतीने पदाचा गैरवापर करत राशिवडेच्या एका संचालकाने मिळकत भाडेतत्त्वावर घेतली होती. त्यावेळी संबंधित संचालकावर अपात्रतेची कारवाई झाली होती. त्यानुसार या तीन संचालकांवरही अपात्रतेची कारवाई होणार का, याकडे आता समितीचे लक्ष असणार आहे.