Kolhapur : अंबाबाई मंदिर परिसरात रोख भरपाईने भूसंपादन

जिल्हा प्रशासनाचा अहवाल; लवकरच समितीच्या बैठकीत निर्णय शक्य : आराखडा गतीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न
Kolhapur News
अंबाबाई मंदिर परिसरात रोख भरपाईने भूसंपादनAdministrator
Published on
Updated on

अनिल देशमुख

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यासाठी करण्यात येणारे भूसंपादन भरपाईची रक्कम देऊनच करणे सोयीचे होईल, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला सादर केला आहे. या समितीची येत्या 15 दिवसांत बैठक होणार असून त्यात याबाबतचा अंतिम निर्णय होईल अशी शक्यता आहे.

करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकासाच्या 1445.97 कोटी रुपयांच्या आराखड्याला 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. तीन टप्प्यांत राबविल्या जाणार्‍या या आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील 143.90 कोटींच्या कामांना 28 ऑगस्ट रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या टप्प्यात मंदिर आणि मंदिराच्या आवारातील संवर्धनाची कामे केली जाणार आहेत. पुरातत्त्व विभागाने त्याचा आराखडा तयार केला आहे. त्याला तांत्रिक मान्यता मिळताच या कामाच्या निविदा काढल्या जाणार आहेत.

आराखड्याच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात दर्शन रांग, दर्शन मंडप, शॉपिंग प्लाझा, अन्नछत्र, पार्किंग आदी कामे केली जाणार आहेत. याकरिता भूसंपादन केले जाणार आहे. या भूसंपादनासाठी 1445.97 कोटींपैकी 980 कोटी 12 लाख रुपयांची रक्कम आराखड्यात प्रस्तावित केली आहे. मात्र, भूसंपादनासाठीचा हा अपेक्षित खर्च कमी करण्यासाठी भूसंपादनाबाबत अन्य पर्याय वापरता येतील का, याबाबतचे धोरण व कार्यपद्धती ठरविण्यासाठी नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

या समितीत नगरविकास विभाग आणि वित्त विभागाचे प्रधान सचिव सदस्य म्हणून, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त विशेष निमंत्रित म्हणून तर नगर रचना व मूल्य निर्धारण विभागाचे संचालक सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. या समितीला जिल्हा प्रशासनाने भूसंपादनाबाबतचा अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये भूसंपादन रोख रक्कम देऊन करावे, अशी सूचना केली आहे. तडजोडीने भूसंपादन झाले तर आणि कायद्यानुसार भूसंपादन झाले तर त्यासाठीच्या अपेक्षित दराचाही या अहवालात समावेश करण्यात आला आहे.

बाधितांना भूसंपादनाच्या बदल्यात टीडीआर देता येईल का, बाधितांना घरे उपलब्ध करून देऊन पुनर्वसन करता येईल का, असेही पर्याय होते. मात्र या पर्यायांपेक्षा भरपाई रक्कम देऊन संपादन करणे अधिक सोयीचे होणार आहे. त्यामुळे विकास आराखड्याच्या अंमलबजावणी गती येईल आणि नियोजित वेळेत हा आराखडा पूर्ण होईल, असेही अहवालात म्हटले आहे.

साडेचार एकरचे होणार संपादन

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसराचा विकास आराखडा एकूण साडेअकरा एकर जागेत राबविला जाणार आहे. यापैकी सुमारे दोन एकर परिसर अंबाबाई मंदिराचा आहे. सुमारे अडीच एकर जागा ही हेरिजेटची आहे तर सुमारे अडीच एकर जागा महापालिकेची आहे. यामध्ये रस्त्यांचाही समावेश आहे. आराखड्यासाठी मंदिराभोवतालच्या साडेचार एकर जागेचे संपादन करावे लागणार आहे.

भूसंपादनाच्या पर्यायाबाबतचा अहवाल राज्य शासनाने नियुक्त केलेल्या समितीला सादर केला आहे. हा आराखडा गतीने मार्गी लागावा याकरीता भूसंपादनाचीही प्रक्रियाही गतीने होणे आवश्यक आहे, याकरीता समितीला लवकर बैठक घेण्याबाबत विनंती केली आहे. या बैठकीत निर्णय होईल अशी शक्यता आहे.
अमोल येडगे, जिल्हाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news