

नागाव; पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा येथे सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात पुलाची शिरोली येथील ४९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. इंजिनिअरिंग कॉलेजच्या बसने दिलेल्या धडकेमुळे ही घटना घडली.
बिरदेव संदीपान ऐवळे (वय ४९, रा. शोभा नगर, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. बिरदेव ऐवळे हे शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित कंपनीत कार्यरत होते. सोमवारी सकाळी रात्र पाळी आटोपून ते घरी आले होते. आंघोळ आणि नाश्ता उरकल्यानंतर, ते आपल्या सायकलवरून श्रमिक कामगार कार्यालयातील एका मिटिंगसाठी निघाले होते महामार्ग ओलांडून नागावच्या दिशेने जात असताना मागून भरधाव येणाऱ्या वाठार येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या हुपरी-रेदाळ मार्गावरील बसने (क्र. एमएच ०९ सीव्ही ७१९) त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली.
या अपघातात ऐवळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना त्वरित उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. बिरदेव ऐवळे मूळचे लक्ष्मी नगर सांगोला येथील असून ते कामानिमित्त गेल्या २५ वर्षांपासून पुलाची शिरोली येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शिरोली परिसरात हळहळ व्यक्त होत असून, उत्तरीय कार्यासाठी पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले आहे.