

दिलीप भिसे
कोल्हापूर : शहर, ग्रामीण भागात सर्वसामान्यांची होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून सतर्कतेचे आवाहन होत असतानाही विनासायास कमाईला सोकावलेल्या सराईत टोळ्यांसह आलिशान थाटात दुकानदारी सुरू केलेल्या नानाविध कंपन्यांकडून फसवणूकीचे फंडे सुरूच आहेत. कोल्हापूर पोलिस दलांतर्गत आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत शहर, जिल्ह्यात बहुचर्चित ठरलेल्या 22 कंपन्यांमधील 223 कोटी 50 लाखांच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश झाला आहे. तब्बल 271 घोटाळेबाजांना यंत्रणेने कळंबा जेल मध्ये धाडले आहे.
जिल्ह्याला फसवणुकीच्या घटना तशा नवीन नाहीत. तरीही फसवणुकीच्या अशा घटनांना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत फसव्या योजना, अल्प मुदतीत दामदुप्पट परतावा, शेअर मार्केट, ट्रेडिंगसह शासकीय खात्यांतर्गत कायम स्वरूपी नोकरीच्या बहाण्याने होणार्या फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात येते. मात्र प्रत्यक्षात खबरदारी न घेता टोळ्यांशी आर्थिक व्यवहार करून स्वत:चीच फसगत करून घेण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.
जि.प. आरोग्य विभागात नोकरीचे आमिष दाखवून फुलेवाडी परिसरातील दोन भामट्यांनी शहर व ग्रामीण भागातील चार बेरोजगारांना 45 लाखांचा गंडा घातला. विशेष म्हणजे तरुणांना नोकरीसाठी बनावट नियुक्ती पत्रेही दिल्याचेही चव्हाट्यावर आले आहे. फसवणुकीच्या कारनाम्यांच्या चौकशीची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. बनावट नियुक्ती पत्रे कुठून आली, कुठे तयार झाली याचा सोक्षमोक्ष लावण्याची गरज आहे.
आर्थिक गुन्हे शाखेमार्फत शहर व जिल्ह्यातील एकूण 22 बहुचर्चित कंपन्यांत झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी सुरू आहे. त्यात 223 कोटी 50 लाख 742 रुपयांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असून 274 घोटाळेबाजांची नावे चव्हाट्यावर आली आहेत. बहुतांशी घोटाळेबाजांना जेलमध्येही धाडण्यात आले आहेत. त्यात शाहूपुरी पोलिस ठाण्यांतर्गत आठ गुन्हे, हातकणंगले पोलिस पाच गुन्हे, शिवाजीनगर दोन, करवीर एक, इचलकरंजी एक, चंदगड एक, मुरगूडमध्ये एक; तर राजारामपुरीतील दोन गुन्ह्यांचा समावेश आहे.