

कासारवाडी : येथील वनपरिक्षेत्रात पर्यावरण नियमांना धाब्यावर बसवत तब्बल ३०० वृक्षांची बेकायदेशीर कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे, तर वनक्षेत्रात ५०० मीटर लांबीचा विनापरवाना रस्ता बनवून गौण खनिजाचीही अवैद्य लूट करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
गावाच्या दक्षिणेला असलेल्या गट क्र. ६३० मधील संरक्षित वनक्षेत्रात हा प्रकार घडला आहे. या जंगलात गवा, बिबट्या, रानडुक्कर, कोल्हा आणि लांडगा यांसारख्या वन्यप्राण्यांचा सतत वावर असतो. मात्र, अज्ञात व्यक्तींनी गेल्या ३० वर्षांपासून असलेल्या सुमारे ३०० झाडांची कत्तल करून जंगल उद्ध्वस्त केले आहे. या वृक्षतोडीतून मार्ग काढत अर्धा किलोमीटर लांबीचा रस्ता बनवून त्याद्वारे गौण खनिजाची अवैध उत्खनन करून चोरी केली जात आहे.
प्रशासनाचा पंचनामा, ग्रामपंचायतीची कारवाईची मागणी
हा गंभीर प्रकार ग्रामपंचायत कासारवाडी व वनहक्क व्यवस्थापन समितीच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ वन विभागाला याची माहिती दिली. त्यानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाई करावी आणि या परिसरात पुन्हा वृक्षारोपण करावे, अशी मागणी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
एकीकडे वृक्षारोपण, दुसरीकडे कत्तल
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासन 'वृक्षलागवड मोहीम' राबवत आहे. मात्र, एकीकडे शासन नवीन वृक्ष लावण्यासाठी प्रयत्नशील असताना, ३० वर्षे जुन्या वृक्षांची दिवसाढवळ्या होणारी कत्तल कोण रोखणार? असा संतप्त सवाल आता पर्यावरणप्रेमी उपस्थित करत आहेत.
"आम्ही गावचे गायरान संरक्षित ठेवण्यासाठी ते वन विभागाकडे वर्ग केले होते. पण, जर वन विभागच जंगलाचे संरक्षण करू शकत नसेल, तर मग जंगल वाचवणार कोण?"
— अच्युत खोत, सरपंच, कासारवाडी