

कोल्हापूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, महाराष्ट्राचे कुलदैवत, दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर विकास आराखड्यासाठीचा पहिला टप्प्यातील निधी ‘नियोजन’मधून दिला जाईल. या आराखड्याची अंमलबजावणी श्री जोतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणातून केली जाईल. या प्राधिकरणाला मंजुरी देत त्याचा शासन आदेशही लवकरच काढला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत जोतिबा डोंगरावर ‘दख्खन केदारण्य’ निर्मितीचा मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत दृरदृश्य प्रणालीद्वारे गुरुवारी सायंकाळी शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे ही दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यानिमित्ताने जोतिबा विकास आराखड्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केदार विजय ग्रंथात नोंद असलेल्या दहा हजार वेगवेगळ्या भारतीय झाडांची लागवड करून वाडी रत्नागिरी डोंगर परिसरातील तीस एकर क्षेत्रात दुर्मीळ ‘दख्खन केदारण्य’ साकारत आहे. आपल्या इतिहासात, संस्कृतीत आणि आपल्या आस्थांमध्ये निसर्गाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. आपले सर्व देवदेवता निसर्गाशी साधर्म्य राखणारे आणि निसर्गाचे संवर्धन करणारे आहेत. निसर्गाची सेवा केल्याशिवाय आपला नमस्कार देवतांपर्यंत पोहोचत नाही.
फडणवीस म्हणाले, जोतिबा विकास आराखड्याची अंमलबजावणीसाठी आवश्यक निधी नियोजन विभागाकडूनच मिळावा आणि प्राधिकरणाकडून या आराखड्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी आमदार डॉ. कोरे यांनी केली आहे. ती पूर्ण करू. नियोजनमधूनच हा सर्व निधी देऊ, लवकरच प्राधिकरण स्थापनेसही मंजुरी देऊ. त्याचा शासन आदेश लवकरच निघेल, असे सांगत या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी शासन पूर्णपणे पाठीशी राहील, असेही त्यांनी सांगितले.